🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यात पोलीस भरती करावी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाच्या तासाचा भत्ता द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता रोहित पवार यांचे आजोबा आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहित राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताणाकडे लक्ष वेधले आहे.
या पत्रात शरद पवार म्हणाले की, जाहीर सभा वा दौऱ्यांच्या ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमन व प्रस्थानावेळी पोलीस प्रशासनावर विशेष ताण असतो. इतर वेळी पोलीस कर्मचाऱ्यांना तासनतास तिष्ठत उभे राहावे लागते. केवळ पोलीस कर्मचारीच नाही तर अशा सभाप्रसंगी पोलीस अधीक्षक व वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील तिष्ठत उभे राहतात, असं ते म्हणाले.
तसेच, सभेच्या बंदोबस्तावेळी पोलीस कर्मचारी-अधिकारी यांनी तत्पर व सज्ज असावयास हवे, मात्र सभा सुरळीत सुरू असताना विशेषत: महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निष्कारण त्रास सहन करावा लागतो असे मला वाटते. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील तिष्ठत राहणे मला उचित वाटत नाही. त्यामुळे सभा शांततेत सुरु असताना महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची अथवा आसन उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी शरद पवारांनी पत्रात केली आहे.
एकीकडे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा केला असताना राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आलं आहे. पोलिसांवरील कामाचा ताण वाढत असल्याने अनेकदा पोलिसांच्या मृत्यूच्या बातम्या समोर येतात. त्यामुळे शरद पवारांनी लिहिलेल्या पत्रावर गृहमंत्री काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
