मुंबई : भारतीय जनतेचे श्रद्धास्थान असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर शिवाजी पार्कजवळील चैत्यभूमीची पडझड सुरू आहे. चैत्यभूमीच्या पुनर्बांधणीसाठी वास्तुविशारदाची नियुक्ती होऊन एक वर्ष लोटले तरीही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमीच्या दुरुस्ती तसेच पुनर्बांधणीचे काम महापालिकेच्या खर्चाने अर्थसंकल्पीय तरतूदीतून तातडीने सुरु करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी ठरावाची सूचना मांडली.
याबाबत स्थायी समिती सदस्य शिरसाट म्हणाले,’पडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र’ ही २८ सप्टेंबर रोजी प्रकाशित झालेली बातमी वाचून मन विषण्ण झाले. चैत्यभूमीच्या पुनर्बांधणीसाठी वास्तुविशारदाची नियुक्ती होऊनही सरकारला याबाबत जाग येत नाही हे दुर्दैव आहे. महापुरुषांची स्मारके नव्या पिढीसाठी मार्गदर्शक असतात. त्याकडे दुर्लक्ष करणे हा त्यांच्या विचारांचा अप्रत्यक्ष अपमानच असतो. चैत्यभूमीची वास्तू धोकादायक बनली असून तेथे वास्तव्यास असलेल्या भंतेजींचे स्थलांतर करण्याच्या सूचनाही पालिकेकडून देण्यात आल्या आहेत. या वास्तूला पुरातन वास्तूचा दर्जा असल्यामुळे दुरुस्तीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचे महापालिकेचे पत्र राज्यशासनाकडे प्रलंबित आहे. दरवर्षी ६ डिसेंबर आणि १४ एप्रिलला लाखोंच्या संख्येने भिमसैनिक आणि सर्वच भारतीय नागरिक येथे दर्शनसाठी येतात. अशावेळी चैत्यभूमीची वास्तू धोकादायक असेल तर गर्दीच्यावेळी गंभीर अपघात घडू शकतो. तरी चैत्यभूमीचे ऐतिहासिक, वैश्विक महत्व लक्षात घेता त्याची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी तातडीने होणे आवश्यक आहे.
या मागणीचा विचार स्थायी समितीत करताना महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारकाच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी रू २९ कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला आहे. त्याचा विनियोग करून त्वरित दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी आराखडे, संकल्पचित्र बनवून हे काम तातडीने हाती घ्यावे. या कामाच्या प्रगतीबाबत पुढील स्थायी समितीमध्ये प्रशासनाला निवेदन करावे असे स्पष्ट निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.
चैत्यभूमीच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीच्या कामाबाबत राज्य सरकार, महापालिका असा गोंधळ न घालता हे काम तातडीने केले जावे. महापालिकेने तातडीने आपल्या अर्थसंकल्पातून यासाठी लागणारी आवश्यक तरतूद त्वरित केली पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे. -भालचंद्र शिरसाट
महत्वाच्या बातम्या
- ‘कोकणाची मुख्यमंत्री निधीकडून उपेक्षा सुरूच,पंतप्रधान सहायता निधीला दिलेली मदत सार्थकी’
- ‘राजाचा जीव पोपटात, तर काहींचा जीव मुंबई महापालिकेत आहे’
- ती’ नटी भाजपचीच कार्यकर्ती; नाव न घेता कंगणावर राऊतांचा हल्लाबोल
- वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर जनतेला दिलासा देण्यासाठी रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल : मनसे
- आयकर विभागाची नोटीस येताच पृथ्वीराज चव्हाण म्हणाले भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे


