बीड : माणसांमध्ये कोरोनाने थैमान घातले असताना आता देशातील 7 राज्यामध्ये पक्ष्यांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. तर चार राज्यात बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आला आहे. यामुळे जम्मू-काश्मीर आणि तामिळनाडूमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. देशातील चार राज्यात बर्ड फ्लूची नोंद झाली असून हिमाचल, एमपी , राजस्थान आणि केरळमध्ये बर्ड फ्लूचा हैदोस पाहायला मिळत आहे. तसेच कर्नाटक, गुजरात आणि हरियाणामध्येही पक्ष्यांच्या मृत्यूने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात अद्याप बर्ड फ्लूचा कोणताही प्रकार आढळलेला नव्हता. मात्र, परभणीतील मुरुंबा गावात एका दिवसांत तब्बल 900 कोंबड्या अचानक मृत्यूमुखी पडल्या आहेत. कोंबड्या अचानक मेल्यामुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान गावातील मृत कोंबड्यांचे सँम्पल्स पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहे. तसेच, अहवाल आल्यावरच पुढील खुलासा होईल असे जिल्हा पशु वैद्यकिय डॉ.अशोक लोणे यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हटले आहे.
त्यानंतर आता बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे देखील दोन दिवसांत २६ कावळे मृतावस्थेत आढळून आले. सुरुवातीला ग्रामस्थांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र अनेक कावळे मृत्युमुखी पडलेले दिसल्यानंतर ग्रामस्थांनी सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे प्रमुख सिद्धार्थ सोनवणे यांना माहिती दिली. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर अधिकाऱ्यांचे पथक गावात दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून कावळ्यांचे मृत अवशेष ताब्यात घेतले.
त्यामुळे राज्यात देखील बर्ड फ्लू चा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरी अद्याप परभणीत झालेल्या कोंबड्यांचा आणि बीड जिल्ह्यात झालेल्या कावळ्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. तर या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांचे घशातील द्रवांचे नमुने, विष्ठेचे नमुने तसेच रक्तजल नमुने तपासणीत बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले होते. राज्यात बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम नियमित राबविण्यात येत असून पुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहे. तसेच सध्या महाराष्ट्रात बर्ड फ्लू नसल्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या
- वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे देशभरात निर्माण व्हावीत – उद्धव ठाकरे
- ..हा तर एमआयएमला बदनाम करण्याचा डाव-खा.इम्तियाज जलील
- ‘भाजप कर्मकांडातच व्यस्त’, मित्रपक्षाकडून भाजपला टोला
- ‘बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्यांनी देश खराब केला’
- कंगनाच्या अडचणीत आणखीन एक भर; मोहिंदर कौर यांनी दाखल केला मानहानीचा खटला


