मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्याच सोबत मुंबई येथील आझाद मैदानावर देखील ठिय्या आंदोलन करण्यात आले. गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यात एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ सरकारने केली आहे, मात्र तरी देखील काही संघटना विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याने हे आंदोलन अद्यापही सुरूच आहे.
यानंतर आता शिवसेनेच्या ‘सामना’ अग्रलेखातून एसटी कर्मचाऱ्यांबाबतचा मुद्दा घेऊन भाजपवर निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे गेले अनेक दिवस मुंबईत आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करत होते. मात्र राज्य सरकारच्या पगारवाढीच्या निर्णयानंतर पडळकर आणि खोत यांनी आंदोलनातून माघार घेतली.
यावरून देखील शिवसेनेने निशाणा साधला आहे. ‘खोत व पडळकर या पुढाऱ्यांचा तसा एस.टी. कामगारांशी संबंध नव्हता. तरीही ते संपकऱ्यांत घुसले, पण संप हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच दोन्ही नेत्यांनी आझाद मैदानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणतात,’ असे शिवसेनेच्या सामना अग्रलेखात म्हंटले आहे.
‘गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत या दोन पुढाऱ्यांनी भरघोस वेतनवाढीचे स्वागत करून संपातून माघार घेतली. भरघोस वेतनवाढ हेच संपकऱ्यांचे मोठे यश आहे, पण संप सुरू करतानाच कधी व कुठे माघार घ्यायची, हे ज्यास कळते तोच कामगार नेता. एखाद्याने अंगावर काळा कोट चढविला व राज्यकर्त्यांवर असभ्य, एकेरी भाषेत हल्ला केला म्हणून आपणच नेते या भ्रमात जे लोक आहेत, त्यांनी कामगारांना संकटाच्या खाईत ढकलू नये,’ असे म्हणत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मलिकांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर? फोटो ट्वीट करत म्हणाले,’या गाडीत बसलेले…’
- प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही- धनंजय मुंडे
- अशा प्रसंगी परमेश्वर व सरकार तरी काय करणार?- संजय राऊत
- ‘…याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणतात’, भाजपवर राऊतांची टोलेबाजी
- महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी राज्य पेटवायचा डाव- यशोमती ठाकूर


