टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या नेत्यांवर पक्ष कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी आणि आमदारांनी पक्ष विरोधी भूमिका घेत आघाडीच्या उमेदवारांंविरोधात काम केले होते.
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक संपली आहे. मात्र देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. याचदरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने मुंबईत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत दुष्काळ व अन्य विषयांवर चर्चा होणार आहे . तसेच या बैठकीत लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे अनेक नेते आणि आमदारांनी पक्ष विरोधी भूमिका घेत शिवसेना-भाजपा तसेच विरोधी पक्षांच्या उमेदवाराला मदत केली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केलेला त्यांचा मुलगा डॉ.सुजय विखे पाटील यांना तर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठींबा दिला होता. तसेच नायगावचे आमदार कालिदास कोळंबकर, कणकवलीचे आमदार नितेश राणे, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनीही पक्ष विरोधी भिमिका घेत विरोधी पक्षाच्या उमेदवारांना मदत केली होती.
कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असून कॉंग्रेसने तो स्वीकारला आहे. परंतु अन्य नेते आणि आमदारांंवर पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे मुंबईतील कॉंग्रेसच्या बैठकीत कारवाई होणार असल्याची शक्यता आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

