🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – आजपर्यंत आदरणीय शरद पवार साहेबांबद्दल खऱ्याखोट्या अशा अनेक गोष्टी लोक आपल्या फायद्यासाठी मांडण्याचा प्रयत्न करत आलेली आहेत. आज तर वारकऱ्यांमधील कुणीतरी त्यांना हिंदुविरोधीच ठरवून वारकऱ्यांच्या कार्यक्रमात त्यांना बहिष्कृत करा अशाप्रकारचे आवाहन केले आहे. हे कोण लोक आहेत? यांच्या पाठीमागे शक्ती कुठली आहे? महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती खऱ्या अर्थाने संतांपासून सुरू झालेली आहे. आणि संतांनी नेहमीच सामाजिक न्यायाची भूमिका मांडलेली आहे. परंतु, सगळ्यांना हेदेखील माहीत आहे की ज्ञानेश्वर महाराजांना कुठल्या संकटातून जावं लागलं. त्यांनाही त्यावेळच्या समाजाने बहिष्कृत केलं होतं. समाजाचं भलं करणाऱ्या माणसाला बहिष्कृत करणाऱ्या अशा प्रवृत्ती प्रत्येक शतकामध्ये महाराष्ट्रात निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. त्याच्याकडे आपण लक्ष्य द्यायचं का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे वारकरी परिषदेच्या पत्रकावर उत्तर देताना विचारला आहे.
शरद पवार हे हिंदूविरोधी असून त्यांना या पुढे वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवू नका असे पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेने जाहीर केले होते . शरद पवार हे नेहमी हिंदू धर्माला विरोध करत असून, रामायणाला ते विरोध करतात, ते नेहमी नास्तिक लोकांना पाठींबा देत असल्याचे पत्रात नमूद केल आहे. या वरून राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय वारकरी परिषदेत वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘राष्ट्रवादीचे क्राँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देव, धर्म मानत नाही. त्यांनी समर्थ रामदास यांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांना धार्मिक कार्यक्रमांना व्याख्यानाला कशासाठी बोलवता? फक्त पैसा आणि प्रसिद्धीसाठी अशा लोकांना कार्यक्रमांना बोलवू नका,’ असे आवाहन निवृत्ती महाराज वक्ते यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
पूर्वीचे राज्यकर्ते साधना करणारे देवनिष्ठ, धर्मनिष्ठ होते. विनम्र होते. आताच्या नास्तिक राज्यकर्त्यांना बोलावून त्यांच्या हस्ते उद्घाटन करणे किंवा त्यांचे व्याख्यान ठेवून पांडुरंगाची अवकृपा करुन घेऊ नका, असं पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेने काढलं आहे.‘ज्यांना हिंदू धर्माबद्दल आदर आहे व ज्यांना धर्मासाठी काम करण्याची मनापासून इच्छा आहे अशा हिंदू धर्माभिमानी राज्यकर्त्यांनाच धार्मिक कार्यासाठी बोलवावे. शरद पवार मुख्यमंत्री असताना महापुजेसाठी गैरहजर राहिले होते. संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ कधीच गेले नाहीत, संत ज्ञानेश्वरांनी संजिवनी समाधी घेतली नाही असे मत मांडणारे तथाकथित पुरोगामी लेखकांना पवारांचा पाठिंबा असतो. अशा लोकांना सद्गुरू जोग महाराज शताब्दी महोत्सवाला बोलवण्यापेक्षा खऱ्या धर्माभिमानी हिंदू पुरस्कर्ते राजकीय व्यक्तीला आमंत्रित करावे,’ असे आवाहन निवृत्ती महाराज वक्ते यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केले आहे.
आता राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टाकले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या प्रसिद्धीपत्रकात ते पुढे असेही म्हणतात, ‘गेल्या ५०-६० वर्षांचा पवार साहेबांचा सगळा राजकीय प्रवास आपण बघितला तर या राजकीय प्रवासाबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रात त्यांनी काम केले. पण, आपल्या उभ्या आयुष्यात पवार साहेबांनी कधीही वारकरी संप्रदायाच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही. हे या महाभागांना माहीतच नसेल अशी शक्यता आहे. कारण हल्ली कुणाचे तरी पिल्लू म्हणून यांना सोडले जाते आणि असे लोक बडबड करत राहातात. त्या बडबडीला काही अर्थ नसतो.’
‘आतापर्यंतच्या कारकीर्दीमध्ये पवार साहेबांसाठी जी आदराची ठिकाणं आहेत त्यामध्ये वारकरी संप्रदाय हा एक महत्वाचा टप्पा आहे. आपल्या सगळ्या सामाजिक कार्याचा पाया हा विठ्ठलाचा आहे. हे असताना कुणीतरी कोत्या प्रवृत्तीच्या लोकांनी पवार साहेबांच्या बाबतीत अशाप्रकारचे वक्तव्य करणं ही खरोखरच दुर्दैवाची गोष्ट आहे. पण यामुळे फार काही फरक पडत नाही. पवार साहेब सर्वांचे आहेत, समाजातले सामंजस्य टिकवण्यासाठी सर्व धर्मांमध्ये एकोपा राहण्यासाठी ते काम करतात. कोण हिंदु, कोण मुस्लिम असा प्रश्न कधीच नसतो’, असेही आमदार टाकले म्हणाले.
पुढे ते असेही म्हणतात, ‘आपल्याला माहिती आहे की आज पंढरीच्या वारीची जी परंपरा आहे त्यात वारीच्या वाटेवर अनेक अशी गावं आहेत जिथे वारकरी आले की त्यांचे स्वागत त्या गावातला मुस्लिम समुदाय करतो. सामाजिक ऐक्य घडवण्याच्या दृष्टीने धर्मांमध्ये अशी ही पीठं आहेत. त्यात पंढरीचा विठुराया हे आद्यपीठ आहे. आणि त्या पीठाचा सन्मान जितका पवार साहेबांनी केला आहे तितके हे जे कुणी बोलताहेत त्यांनी केला असेल का ही शंका आहे. पण या संकुचित मनोवृत्तीमुळे लोकांनी अस्वस्थ होण्याचं कारण नाही. कारण पवार साहेब किती मोठे आहेत, त्यांची विचारप्रणाली काय आहे हे महाराष्ट्राला नव्हे, सबंध देशालाच नव्हे, तर सबंध जगाला माहीत आहे. त्यामुळे केवळ राजकीय फायद्यासाठी अशाप्रकारची हुल्लडबाजी कुणी करत असेल, आणि त्यामुळे समाजमान्यता मिळेल असं त्यांना वाटत असल्यास ते मुर्खांच्या नंदनवनात राहात आहेत. त्यांना मी जाणीव करून देतो की एक फार मोठा वर्ग समाजात आहे की जो समाजातील सामंजस्य टिकवण्याच्या बाजूने आहे. आणि तुमच्यासारखे नतद्रष्ट लोक जर याच्यात कुठे पाय आडवा घालणार असतील तर तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता गप्प बसणार नाही.’
दरम्यान, आता राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वारकरी परिषदेवर निशाणा साधला आहे.वारकरी प्रथा परंपरा सुरु झाली ती इथल्या कर्म कांडा विरुद्ध पांडुरंग भक्ती मध्ये तल्लीन झालेले संत याचेच प्रबोधन करत होते. कट्टर मनुवादी त्याला विरोध हे वारकरी परिषद वाले कोण आहेत?, याची ओळख द्यायला नको, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
