लातूर : जून महिना उजाडला तरी अद्याप शिरुरअनंतपाळ तालुक्यातील तब्बल ३० गावातील हजारो शेतक-यांना दुष्काळी अनुदान मिळाले नसल्यामुळे या शेतक-यांची दुष्काळी अनुदानाची प्रतिक्षा कधी संपणार ?असा संतप्त सवाल मनसे जिल्हाध्यक्ष डाँ.नरसिंह भिकाणे यांनी एका प्रसिध्दीपञकाव्दारे उपस्थित केला आहे. शासनाने शिरुरअनंतपाळ हा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला आहे.या पार्श्वभूमीवर शासनाकडून या तालुक्यासाठी दुष्काळी अनुदानापोटी १६ कोटी २१ लाख रुपये एवढा निधी देण्यात आला आहे.परंतु आजतागायत केवळ १८ गावातील शेतक-यांना दुष्काळी अनुदान जे हेक्टरी ६८०० रु आहे आणि ते २ हेक्टर पर्यंतच दिले जाणार आहे म्हणजे १३ हजार ६०० रु शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत.
या निकषानुसार तालुक्यातील केवळ १८ गावातील शेतक-यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात आले आहे.परंतु राहिलेल्या ३० गावातील शेतक-यांच्या खात्यावर माञ केवळ ६८०० रु म्हणजे केवळ ५० टक्केच निधी जमा करण्यात आल्याचे शेतकरी सांगतात तर तहसीलदार माञ तालुक्यातील ४८ गावातील प्रत्येक शेतक-यांच्या खात्यावर १८९४८ रुपये हे लोकसभा निवडणूकीच्या आधीच जमा केल्याचे सांगतात ! याबाबत तहसील कार्यालयातून १६.२१ कोटी पैकी अद्याप ११ कोटी निधी प्राप्त झाला आहे तर उर्वरीत निधी येणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.
या तफावतीमुळे तालुक्यातील शेतक-यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून दुष्काळी अनुदानाची नेमकी रक्कम किती असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.शासनाकडून तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे.पाणी टंचाईचा प्रश्न तालुक्यात भीषण असताना ग्रामीण भागात पाण्याचे टँकर नाहीत केवळ २६ विंधन विहीरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे तर शहराला १५ दिवसाआड पाणी येत असताना देखील शहरात एकाही विंधन विहीरीचे अधिग्रहण करण्यात आले नाही यामागचे नेमके गौडबंगाल काय आहे ?असा प्रश्न डाँ.भिकाणे यांनी उपस्थित केला आहे.
चारा छावण्याबाबत प्रशासनास विचारले असता चारा छावणीची एकही मागणी पशूपालकांकडून करण्यात आली नसल्यामुळे तालुक्यात एकही चारा छावणी सुरु करण्यात आली नसल्याचे महसूल विभागातील अधिका-यांकडून सांगण्यात आले.दुष्काळग्रस्त तालुक्यासाठी चारा छावणी सुरु होत नसेल तर चारा छावणी नेमके कोठे सुरु करणार असा संतप्त सवाल उपस्थित करुन तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियानाचे पितळ उघडे पडू नये म्हणून या तालुक्यात चारा छावणी सुरु करण्यात आली नाही तर शहरात विंधन विहीरीचे जाणूनबुजून अधिग्रहण करण्यात आले नसल्याचा आरोप या प्रसिध्दीपञकात करण्यात आला आहे.
जून महिना उजाडला तरी अद्याप तालुक्यातील ३० गावातील हजारो शेतक-यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे.एक आठवड्याच्या आत दुष्काळी अनुदान शेतक-यांच्या खात्यावर जमा न झाल्यास निलंगा येथील उपविभागीय कार्यालयासमोर मनसेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा या प्रसिध्दीपञकात देण्यात आला आहे.


