मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच ठाकरे सरकारनं शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यात आलं आहे. एप्रिल महिन्याअखेर कर्जमाफीचा लाभ टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी महाराष्ट्रातील 34 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती एकत्र करण्यात आली होती.
मात्र दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. विरोधकांनी केलेल्या टिकांवर काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे सरकारकडून करण्यात आलेली कर्जमाफी ही फसवी असून, सरकारने सरसकट कर्जमाफीचा शब्द पाळला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘मागच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयांच्या आणि बँकेच्या खेट्या माराव्या लागत असे. त्यामुळे मागच्या सरकारला शेतकरी कर्जमाफीवर बोलण्याचा अधिकार नसून, त्यांनी पाच वर्षे फक्त कर्जमाफीचा गाजावाजा केला असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
दरम्यान, भाजपा नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘सरकारची शेतकरी कर्जमाफीची आकडेवारी ही फसवी असल्याचा आरोप त्यांनी ठाकरे सरकारवर केला. ‘सरकारनं शेतकरी कर्जमाफीची केलेली घोषणा ही फसवी आहे. सरकारनं जाहीर केलेल्या आकड्यांमधील अनेकांची संपूर्ण कर्जमाफी होणार नाही, असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली.


