🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेच्या निवडणुकीत तिसरी ताकद म्हणून पुढ आलेली प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि ओविसींची एमआयएम यांची आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती तुटल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे संकेत मिळत आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी याला दुजोरा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचा परत एकदा विचार करत आहोत.पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही जागांबाबत तडजोड करण्यास तयारी दर्शवली आहे”, अशी माहिती ओवेसी यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीतली जागा वाटपावरून एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये वाद निर्माण सुरु झाला होता. जागा वाटपामध्ये २८८ पैकी ८ जागा या एमआयएमसाठी सोडल्यामुळे युती तोडल्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले होते. त्यानंतर सन्मानजनक जागा न दिल्याने एमआयएमने वेगळे होण्याचा निर्णय घेत युती तुटल्याची घोषणा केली होती. तसेच वंचितसोबतची युती तोडण्याचा मोठा निर्णय मी पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगीशिवाय घेऊ शकत नाही. हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांनीच घेतला आहे,असे जलील म्हणाले आहेत.
वंचितसोबत जाण्यासंदर्भात यावेळी बोलताना जलील म्हणाले,एमआयएम-वंचित आघाडी होण अवघड आहे, असं मला वाटत नाही. मोठा भाऊ म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपावर तोडगा काढला, तर पुन्हा नव्याने सुरूवात करण्याची आमची इच्छा आहे. प्रकाश आंबेडकरांनी असदुद्दीन ओवेसींसोबत पुन्हा चर्चा करण्याची तयारी दर्शवली तर आम्ही तयार आहोत,असे जलील म्हणाले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला ४० लाखांहून अधिक मतं मिळाली होती. औरंगाबादमधून एमआयएमकडून इम्तियाज जलील निवडून आले. तर सांगली, सोलापूर, परभणी, गडचिरोली-चिमूर, बुलडाणा, हातकणंगले या लोकसभेच्या सात जागांवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना लाखांहून अधिक मतं मिळाली होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
