🕒 1 min read
नागपूर : देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत देशभरात एकूण चार हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. पुण्यासह राज्यात आणि देशात कोरोनाबाधितांची संख्या चिंता वाढवणारी आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभर लॉकडाऊन सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर कार्यालय आणि इतर ठिकाणीही जयंती कार्यक्रमात पाचपेक्षा अधिक लोकं नको आणि ते ही सामाजिक अंतर राखूनच कार्यक्रम घेण्यात यावा, असे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले आहेत. असं वृत्त tv9 मराठी ने दिलं आहे.
तसेच कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी साजरा करण्यास प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. त्यामुळे 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम लॉकडाऊन कालावधीत दीक्षाभूमी तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी साजरा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम किंवा इतर कोणताही कार्यक्रम साजरा करताना पाच पेक्षा जास्त लोक नसतील इतक्या व्यक्तींच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवून आणि चेहऱ्यावर मास्क किंवा कापडी मास्क परिधान करून नियमानुसार साजरा करता येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.

