मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आजच्या रोखठोकमधून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. निवडणुका आल्या की, आजचे दिल्लीतील सत्ताधारी हिंदू पुढारी नवनवी मंदिरे बांधण्याचा संकल्प सोडतात. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत आता अयोध्येचे महत्त्व संपले. त्यामुळे मथुरेत मंदिर बांधून देऊ असे सांगितले गेले. पण शेतकऱ्यांच्या आंदोलनात ७०० बळी मंदिर बांधून देऊ असे सांगणाऱ्या माणसांनीच घेतले. त्यातील १३ जण तर लखीमपूर खिरीत चिरडून मारले गेले. त्यांच्या गुन्हेगारांना मंत्रिमंडळात ठेवून कोणते मंदिर बांधणार? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
पुढे राऊत लिहितात, हिंदू समाजाला अधोगतीकडे नेण्याचे हे प्रकार आहेत. हिंदू म्हणून न्यायप्रिय धर्मराजाचा आदर्श बाळगायला कोणी तयार नाही. राज्यकर्त्यांनी हिंदू म्हणून फक्त धर्माच्या अफूची गोळीच समाजाला पाजली व सगळे बिघडून गेले. ‘शिवसेनेने हिंदुत्व सोडले,’ असे अमित शहा पुण्यात बोलून गेले. पण आज समाजात कोणत्या हिंदुत्वाचे आदर्श पाळले जात आहेत? लंकेवर विजय मिळवून सीतेच्या अब्रूचे संरक्षण करणारा तो वनवासी राम कुठे दिसतो का? भरसभेत द्रौपदीच्या अब्रूचे रक्षण करणारा कृष्णही दिसत नाही. पण मथुरेत त्याचे मंदिर बांधले जाईल व मते मागितली जातील. एकदा केलेली प्रतिज्ञा काटेकोरपणे पाळणारे ते राजर्षी भीष्म तरी कोठे आहेत? केवळ स्वप्नात दिलेले वचन पाळणारा सत्यवादी राजा हरिश्चंद्र कोठेच का दिसत नाही?
अल्पशा अपमानाचे शल्य उरी बाळगून रानावनांत हिंडत भगवंतप्राप्ती करून घेणारा तो ध्रुवबाळ आज कुणाला आठवतोय का? केवळ ज्ञानाची पूजा करणारे ज्ञानदेव, भक्तीवर अपार श्रद्धा ठेवणारे ते थोर भक्त नामदेव आणि आम्हा विष्णुदासांना द्रव्य हे मृत्तिकेसमान आहे असे शिवाजीराजांना सांगणारे तुकाराम तरी कोठे आहेत? महाराष्ट्राला हिंदवी राजा दिल्यावर, ‘उदंड झाले उदक स्नानसंध्या करावया’ ही रामभक्त समर्थ रामदासांची आरोळी पुन्हा ऐकू येईल काय? कोठे आहेत ते हिंदुपदपातशहा शिवाजी महाराज? स्वराज्याचा महामंत्र देणारे लोकमान्य टिळक? सत्याची कास धरणारे महात्मा गांधी फक्त संसद भवनासमोर पायाची घडी घालून ध्यानस्थ बसले आहेत.
त्या गांधींच्या पायाशी संसदेतील १२ खासदार तीन आठवडे बसले होते तेव्हा गांधींच्या डोळ्यांतील अश्रू त्यांच्या शरीरावर कदाचित ओघळले असतील. आजही लोकांना गांधींचाच आधार आहे. १९७१ च्या बांगलादेश युद्धात विजय मिळवून देणाऱ्या इंदिरा गांधींचे नाव सरकार घेत नाही. गोवा मुक्ती लढ्यात पोर्तुगीजांना हाकलून देणाऱ्या पंडित नेहरूंचे नाव आपले पंतप्रधान घेत नाहीत. देश घडविणाऱ्या, इतिहास रचणाऱ्यांची नावे टाळून नवा इतिहास घडविता येत नाही हे त्यांना कधी समजणार? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “स्वतःला ‘देव’ म्हणवून घेणारे तोऱ्यात वावरत आहेत”, राऊतांचा राेखठोकमधून मोदींवर प्रहार
- “लोकसभेच्या गॅलरीतून डोकावणारे पत्रकार ही लोकशाहीची खरी…”, लोकसभेत पत्रकार बंदीवर राऊतांची टीका
- शाळेबाबत अद्याप निर्णय नाही; राजेश टोपेंची माहिती
- …म्हणून मेनका गांधींनी माझी भेट घेतली; आव्हाडांनी केला त्या भेटीचा खुलासा
- केंद्र सरकार पुन्हा कृषी कायदे आणण्याच्या तयारीत?; केंद्रीय कृषीमंत्र्यांचं धक्कादायक वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
