मुंबई : करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याच धर्तीवर मुस्लिम समाजाच्या बकरी ईद सणाला व त्या दिवशी देण्यात येणाऱ्या कुर्बानीला परवानगी देण्यात यावी,’ अशी मागणी माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे.
येत्या १ ऑगस्ट रोजी ईद उल अदहा म्हणजे बकरी ईद हा मुस्लिमांचा एक महत्त्वाचा सण आहे. करोनाच्या संकटामुळं धार्मिक उत्सवांवर अनेक प्रकारचे निर्बंध असल्याने हा सण कसा साजरा करायचा याबाबत मुस्लिम समाजात संभ्रम आहे. त्याच पार्श्वभूमीवर नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी बकरी ईदबाबत व कुर्बानी करण्याच्या व्यवस्थेविषयी सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
‘बकरी ईद हा सण मुस्लिम समाजासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्या दिवशी कुर्बानी देणे अनिवार्य असते. हा सण जवळ आल्यानंतरही सरकारनं याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं मुस्लिम समाज व संघटनांमध्ये अस्वस्थता आहे,’ असे नसीम खान यांनी पत्रात म्हटले आहे. ‘सरकारने काही अटी शर्थीच्या आधारे गणेशोत्सवास परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे बकरी ईदलाही परवानगी दिली जावी, तसंच कुर्बानीतून सूट दिली जावी,’ असे खान यांनी म्हटले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

