टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने देशातील मित्र पक्षांबरोबर चांगलेच जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यंदा मोदी सरकार न येता एनडीए सरकार सत्तेवर येणार असल्याची शक्यता आहे. अशीच शक्यता भाजपाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी देखील वर्तवली आहे. ते म्हणाले की यंदा भाजपाला गेल्या निवडणुकीप्रमाणे संपूर्ण बहुमत मिळणार नसल्याने भाजपला सत्ता स्थापनेसाठी मित्र पक्षांची गरज भासणार आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांनी हे सूचक विधान केले आहे.
यावेळी राम माधव म्हणाले की, आम्हाला २७१ जागा मिळाल्या, तर आनंदच आहे. अन्यथा मित्रपक्षांच्या सोबतीनं आम्ही अगदी आरामात सरकार स्थापन होईल. उत्तरेकडच्या राज्यांमध्ये पक्षाला नुकसान झाले तरी, त्याची भरपाई ईशान्य, पूर्वेतल्या राज्यांमधून आणि पश्चिम बंगाल, ओडिशात होण्याची शक्यता आहे. असे ते म्हणाले.
तसेच पूर्व भारतात आम्ही अतिशय उत्तमपणे प्रचार केला. तसाच प्रचार आम्ही दक्षिणेत केला असता, तर आम्ही आणखी चांगल्या परिस्थितीत असतो, अशा शब्दांत त्यांनी भाजपाच्या कामगिरीचं विश्लेषण केलं. यंदाच्या निवडणूक निकालावर भाष्य करताना माधव यांनी भाजपाला फटका बसू शकतो, याची अप्रत्यक्ष कबुली दिली. गेल्या निवडणुकीवेळी सरकारच्या विरोधात वातावरण होतं. त्यामुळे आम्हाला मोठं यश मिळालं. त्यामुळे यंदा त्या निकालाची पुनरावृत्ती होईलच असं नाही, असं माधव म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

