सोलापूर प्रतिनिधी: कोरोनाचे कारण पुढे करत मंदिर समितीने ३० सप्टेंबरपर्यंत विठ्ठल मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वंचीत बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पंढरपुरातील आंदोलनानंतर सरकारने मंदिरे उघडण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मंदिर समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर उघडण्याचा मार्ग तूर्तास बंद झाला आहे.
पंढरपूर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यासंदर्भात १ सप्टेंबर रोजी मंदिर समितीची बैठक घेतली होती. या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. मंदिराचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी ३० सप्टेंबरपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याबाबतची माहिती पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. कोरूना च्या पार्श्वभूमीवर सरकारने मार्च महिन्यात लोक डाऊन घोषित केला होता. तेव्हापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.
अन्यथा सरकारचे आदेश झुगारून मंदिर प्रवेश करु,राज ठाकरेंचा इशारा
३१ ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरात मोठे आंदोलन झाले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोड्या दिवसातच मंदिरे उघडली जातील असे आश्वासन आंदोलकांना दिले होते. यामुळे वारकरी व भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीच मंदिर समितीच्या झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत 30 सप्टेंबर पर्यंत विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने वारकर्यांसह भाविकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
पांडुरंग रायकर शासकीय अनास्थेचा बळी:- राधाकृष्ण विखे


