लातूर :- जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसापूर्वी अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने तात्काळ करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश पर्यावरण, संसदीय कार्य, भूकंप पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा व स्वच्छता, रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
निलंगा तालुक्यातील नामेजवळगा, कासारशिरसी सावरी तर औसा तालुक्यातील मातोळा या गावातील अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकांची पाहणी राज्यमंत्री बनसोडे यांनी केली. यावेळी निलंगा विधानसभा मतदार संघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, निलंगा उपविभागीय अधिकारी विकास माने, अवसा रेनापुर चे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार व संबंधित अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
बनसोडे यांनी अतिवृष्टीने सोयाबीन तूर या पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली व सदरील नुकसानीचे पंचनामे संबंधित विभागाने तात्काळ पूर्ण करावेत व त्याबाबतचा सकारात्मक अहवाल शासनाला सादर करावा. आपल्या जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीबाबत माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना अवगत करून आपल्या जिल्ह्यासाठी शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
या अतिवृष्टी ने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे. या नैसर्गिक आपत्तीत शासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहील, असे राज्यमंत्री बनसोडे यांनी आश्वस्त केले. तसेच ज्या गावातील रस्ते वाहून गेलेले आहेत तसेच घरांची पडझड झालेली आहे अशा लोकांना व गावांना ही मदत देण्यात येणार असून वाहून गेलेल्या रस्ते दुरुस्तीचे कामेही ही त्वरीत करण्याबाबत सूचित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकांचे, रस्त्यांचे व घरांच्या नुकसानीबाबतची माहिती राज्यमंत्री यांना यावेळी दिली. तसेच प्रशासनाच्या वतीने सर्व तालुकास्तरीय व ग्रामस्तरावरील यंत्रणांना प्रत्येक गावात व प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून त्यानुसार पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी राज्यमंत्री बनसोडे यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे सांगून त्यांना धीर दिला.
महत्वाच्या बातम्या-
- अतिवृष्टीग्रस्त भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी अमित देशमुख दोन दिवसीय दौऱ्यावर
- ‘मुख्यमंत्र्यांना देवीने सुबुद्धी द्यावी आणि लवकरात लवकर मंदिरे सुरू व्हावीत’
- शिवसेनेसोबत पुन्हा युती करणार का ? अमित शाह म्हणाले….
- मुख्यमंत्रीही जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर ; दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर
- मदत व पुनर्वसन मंत्री आजपासून नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर; जनतेला मोठ्या अपेक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

