नांदेड : आज मोदी सरकारने ७ वर्षे पूर्ण केली आहेत. मोदी २.० सरकारच्या २ वर्षे देखील पार पडले असून भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष आज देखील पाहायला मिळाला. भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांपासून ते जिल्हास्तरीय नेत्यांपर्यंत सर्वांनीच मोदी सरकारच्या काळातील कामगिरीचा पाढा वाचत कौतुक केलं.
तर, काँग्रेसच्या राहुल गांधींपासून ते राज्यातील सर्वच नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या अपयशाचे मुद्दे मांडून ठिकठिकाणी आंदोलने करत केंद्र सरकारचा निषेध केला. काँग्रेस नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. मोदी सरकारच्या सात वर्षांत देशाला खोटी भाषणे, आश्वासने आणि जुमला मिळाला, असा प्रहार अशोक चव्हाण यांनी केला.
‘मागील सात वर्षांत देशाला दमदार पण पोकळ भाषणे मिळाली, खोटी आश्वासने मिळाली, आणि आम्ही जो शब्द दिला, तो तर केवळ निवडणुकीचा एक जुमला होता, असे सांगण्याइतपत निर्ढावलेपणा मिळाला. मागील सात वर्षांत देशाला दक्षिण भारतीय चित्रसृष्टी, बॉलीवूड आणि हॉलीवूडलाही लाजवेल, असे स्टंट मिळाले. जुन्या काळातील राजे-रजवाड्यांच्या समारोहांना मागे टाकतील, असे शाही इव्हेंट मिळाले,’ अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.
पुढे ते म्हणाले, ‘देशाला लोकशाही व अधिकारांची गळचेपी मिळाली. अभिव्यक्तीवर निर्बंध मिळाले, दडपशाही मिळाली. संवैधानिक संस्था आणि तपास यंत्रणांमध्ये हस्तक्षेप मिळाला. देश व धर्माच्या नावाखाली ज्वलंत प्रश्नांना मागे टाकण्याचे नवे शासकीय धोरण मिळाले. मागील सात वर्षांत देशाला बेरोजगारी, महागाई, आर्थिक मंदी आणि ढासळती अर्थव्यवस्था मिळाली. कच्च्या तेलाच्या किंमती कमी झालेल्या असताना शंभरीपार झालेले पेट्रोल मिळाले. गरिबांना अधिक गरीबी तर निवडक धनदांडग्यांना अधिक श्रीमंत होण्याची खुली सूट मिळाली.’
तर, ‘मागील सात वर्षांत देशाला आधीच्या पिढ्यांनी दूरदर्शीपणे उभी केलेली राष्ट्रीय संपत्ती विकून चैन करणारे दिवाळखोर सरकार मिळाले. साम, दाम, दंड, भेद कसेही का होईना, पण फक्त निवडणूक जिंकणे हेच एकमेव उदिद्ष्ट ठेवून काम करणारी सत्तापिपासू राजकीय व्यवस्था मिळाली. मागील सात वर्षांत देशाला नोटबंदी, जीएसटी, कोरोनाकडे दुर्लक्ष अशा एका पाठोपाठ एक विनाशकारी घोडचुका मिळाल्या. खा. राहुल गांधी आणि काँग्रेसने त्या चुका लक्षात आणून दिल्यानंतरही केवळ राजकीय अहंकारातून त्यात सुधारणा नाकारणारे हटवादी राज्यकर्ते मिळाले,’ असे एकामागे एक आरोप करत आज अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारवर प्रहार केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाचा उगम चीनच्याच प्रयोगशाळेत; समोर आला ‘हा’ पुरावा
- कोरोनाचा उगम चीनच्याच प्रयोगशाळेत; समोर आला ‘हा’ पुरावा
- मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला ; शिवसेना खासदाराची टीका
- छपाईच्या पलीकडं ‘वसुली सरकार’ला काहीही सुचत नाही; भाजप आमदाराची खोचक टीका
- ‘मुख्यमंत्री ठाकरे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, नागरिकांना लॉकडाऊनमध्ये ठेवणं त्यांनाही आवडत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

