सोलापूर प्रतिनिधी: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याला पुरोगामी विचारांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मात्र याच तालुक्यात अंधश्रद्धेचे स्तोम माजल्याचे समोर आले आहे. बार्शी शहरातील पारधी वस्ती येथे काही महाभागांनी ‘कोरोना’ नावाच्या देवीची स्थापना केली आहे. एवढंच नाही तर स्थापन केलेल्या कोरोना देवीला प्रसन्न करण्यासाठी कोंबडं अन् बोकडाचा बळी देवून तिचं पूजन देखील केलं आहे.
बार्शी तालुक्यात यापूर्वी अनेक जागतिक कीर्तीचे समाज सेवक, शाहीर होऊन गेले आहेत. त्यांनी समाजातील अज्ञान अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी जीवाचे रान करत समाजसुधारणा मध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. मात्र या भागातील पारधी समाज आजही शिक्षणापासून कोसो मैल दूर आहे. जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का पडल्याने हा धाडसी समाज मुख्य प्रवाहातून बाजूला फेकला गेला आहे. त्यामुळेच या समाजात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहे. जी की, या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बाधा निर्माण करत आहे.
श्रीरामपूरमध्ये जिल्हा परिषद सदस्य व बाजार समितीचे संचालक एकमेकांना भिडले!
कोरोना महामारी मुळे हे संपूर्ण जग हैराण झाले आहे. जागतिक दर्जाचे वैज्ञानिक या महामार्गावर शोधण्यासाठी डोळ्यात तेल घालून प्रयत्न करीत आहेत. असे असताना बार्शी शहरातील पारधी वस्तीत एका घराबाहेर काही जणांनी मिळून फरशीचा छोटासा ओटा तयार करुन त्यावर एक दगड ठेवला आहे. तर याच भागात दुसऱ्या ठिकाणी अनेक फोटोंसह देऊळ बांधण्यात आलं आहे. एका महिलेनं तर देवघरात लिंबू ठेवून ‘कोरोना’ देवीची स्थापना केली आहे. कोरोना महामारीमुळे कोरोना देवीची स्थापना आणि पूजन केल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. या कोरोना देवीची मनोभावे सेवा केली तर आमचे काहीही वाईट होणार नसल्याची भावना देखील या लोकांतून व्यक्त केली जात आहे.
श्रीगोंदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शुभांगी पोटे आणि नगरसेवक पोटे यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार?
या बाबतची माहिती उजेडात येताच बार्शी शहरासह संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी जिल्ह्याची वैद्यकिय यंत्रणा, शासन आणि प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहेत. मात्र बार्शीतील पारधी समाजानं अज्ञानाच्या अंधःकारामुळे २१ व्या शतकात कोरोना देवीची स्थापना करून पूजन केल्याने ही नवीनच समस्या निर्माण झाली आहे. अनपेक्षीतपणे आणि शिक्षणाच्या अभावामुळे त्यांच्याकडून अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात आहे.
निलेश राणे म्हणजे पिसाळलेला श्वान, शिवसेना नेत्याचा घणाघात
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या बाबत आक्षेप नोंदवला आहे. माणसाचं मन भावनिकतेने विचार करतं. त्यातूनच हे लोक अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. कोरोना या विषाणूजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, शारिरीक अंतर हाच सध्या तरी उपाय असल्याचे आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. यापूर्वी देवी नावाच्या रोगाचे मोठ्या संख्येने रूग्ण होते. त्यावर संशोधकांनी लस शोधून त्याचे निर्मूलन करण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे. या ही महामारी वर लस निघेल असा विश्वास अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व्यक्त केला आहे. तसेच या समाजाचे समुपदेशन व प्रबोधन करण्याचे गरजेचे आहे. कारण यामुळे समाजामध्ये अंधश्रद्धा पसरण्याची भीती आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

