🕒 1 min read
मुंबई-राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत पर्यटन संचालनालयामार्फत आज आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली. मिशन बिगिन अगेन अंतर्गत ५ ऑक्टोबरपासून ५० टक्केपेक्षा जास्त नाही इतक्या क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट सुरू झाले आहेत, त्यापूर्वीच दारू विक्रीही सुरू करण्यात आलेली आहे. मात्र हे सरकार सर्व धर्माचे धार्मिक स्थळे उघडायला तयार नाही. यासाठी अनेक संस्था संघटना यासाठी आंदोलन करत आहेत.यातच आता राज्यात बार सुरु आणि मंदिर बंद या काळ्या निर्णयाविरोधात आणि मंदिरे तातडीने उघडावीत या मागणी करिता आध्यात्मिक समन्वय आघाडी अधिक कृ. एकादशी दि. १३ ऑक्टोबर २०२० रोजी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण करणार आहे. आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी आज नाशिक येथे याबाबत घोषणा केली.
महाराष्ट्रातील विविध संप्रदायाचे प्रमुख, साधु-संत, महंत, धर्माचार्यांसह अनेक धार्मिक व आध्यात्मिक संघटना त्याचबरोबर मंदिरांवर उपजीविका अवलंबून असलेले घटक आणि भाविक भक्त यात सहभागी होतील. एकदिवसीय लाक्षणिक उपोषणात राज्यातील प्रमुख मंदिरांसमोर उपवास, भजन करुन “मंदिरे बंद ठेऊन उघडलेस बार, उद्धवा धुंद झाला तुझा दरबार !” अशा घोषणा देण्यात येतील. महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी देखील या उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
याच मुद्द्यावरून आता एमआयएमचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सरकारवर टीका केली आहे.बिअरबार उघडे ठेवून धार्मिक स्थळे बंद ठेवणारे आघाडी सरकार दारुड्यासारखे वागत असल्याची टीका जलील यांनी केली आहे. सर्व सामाजिक धार्मिक स्थळे सुरू केली जावीत अशी भूमिका घेणारे इम्तियाज जलील औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
ज्या मंदिराच्या प्रश्नावरुन शिवसेना राजकारणात आली, मोठी झाली, यश मिळालं. मात्र त्यांचं सरकार सत्तेत असताना त्यांना मात्र मंदिरांचा विसर पडला आहे का? असा रोखठोक प्रश्न देखील इम्तियाज जलील यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- ‘बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र व मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आली’
- टाळेबंदीपूर्वीच्या पद्धतीप्रमाणेच आता गाडी सुटण्याच्या 30 मिनिटे अगोदर मिळणार दुसरी आरक्षण यादी
- मराठा आरक्षण : युवकाला शिव्या देत दमदाटी करणाऱ्या सत्तारांना अटक करा
- रस्त्यावर फिरून वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांच्या मदतीला धावले मोदी सरकार
- जाणून घ्या मोदींनी गेल्या सहा वर्षात खरच पिकांच्या किमान हमी भावात टप्याटप्याने वाढ केली का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
