दिग्विजय दीक्षित, पुणे : हळूहळू आपण यावर्षीच्या IPL मोसमाच्या मध्यंतराकडे वाटचाल करत आहोत. साधारण सर्व संघांचे ६ च्या आसपास सामने खेळून झालेले आहेत. या मोसमाची सुरवात झाली ती मुंबई आणि चेन्नई या सर्वाधिक यशस्वी संघांच्या दरम्यानच्या सामन्याने. या सामन्यात अंबाती रायडूच्या धमाकेदार कामगिरीमुळे चेन्नईने मुंबईच्या संघावर विजय मिळवला आणि क्रिकेटरसिकांना हव्याहव्याशा IPL-2020 चा श्रीगणेशा झाला.
दुसऱ्याच सामन्यात आपल्याला ‘Super Over’ चे दर्शन होईल असे कोणालाही वाटले नव्हते. दिल्ली आणि पंजाब यांच्यात झालेल्या या सामन्यात स्टोईनिस आणि मयंक अगरवाल यांनी आपापल्या संघाकडून एकाकी झुंजीमुळे रंग भरले. पंजाबच्या हातात सामना पूर्णपणे हातात आलेला असे वाटत असताना आणि ३ चेंडूत केवळ १ धावेची गरज असताना, पंजाबचे फलंदाज एकामागून एक बाद होतात काय आणि सामना ‘Super Over’ मध्ये जातो काय! एकंदरीत या रोमहर्षक सामन्यात स्टोईनिसने केलेली दुहेरी कामगिरी दिल्ली संघाला अत्यंत फायदेशीर झाली.
यानंतर सातव्या सामन्यात दिल्लीची गाठ अनुभवी आणि यशस्वी अशा धोनीच्या चेन्नईशी पडली. या सामन्यातही दिल्लीने ४४ धावांनी सहज विजय मिळवला. ११ व्या सामन्यात मात्र डेविड वॉर्नरच्या हैद्राबाद कडून १५ धावांनी दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला. यात मुख्यत्वे दिल्लीची ढेपाळलेली फलंदाजी आणि भुवनेश्वर-राशीद यांनी टिच्चून केलेली गोलंदाजी या कारणांनी हा सामना दिल्लीने गमावला.
१६ व्या सामन्यात शारजाहच्या छोट्याशा मैदानावर दिल्लीने श्रेयसच्या ३८ चेंडूत ८८ च्या बळावर कोलकाताच्या संघावर विजय मिळवला आणि यानंतरही दिल्लीची घोडदौड सुरूच राहिली. १९ व्या सामन्यात विराट कोहलीच्या बंगलोर संघाचा ५९ धावांनी आणि कालच्या २३ व्या सामन्यात स्मिथच्या राजस्थानचा शारजाहच्या मैदानावर ४६ धावांनी धुव्वा उडवला. या सर्व सामन्यानंतर दिल्लीने अंकतालिकेत सर्वोच्च स्थान गाठले आहे, याबरोबरच सध्या ६ सामन्यात १० गुण मिळवणारा एकही संघ अंकतालिकेत नाही!
थोडक्यात दिल्ली संघाने IPL च्या मध्यंतराजवळ अंकतालिकेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या सर्व सामन्यातील विजयानंतर एक गोष्ट नक्कीच नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे दिल्ली संघाच्या व्यवस्थापनाने तरुण खेळाडूंवर दाखवलेला विश्वास हा त्यांनी नक्कीच सार्थ ठरवलेला आहे. परंतु त्याचबरोबर मागील वर्षी जेव्हा गौतम गंभीरने दिल्लीच्या पराभवांची जबाबदारी देत आपले कर्णधारपद सोडले आणि एका नवख्या तरुणाकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली तेव्हाच कदाचित या नवीन अध्यायाची सुरवात झालेली होती.
थोडक्यात दिल्ली संघाच्या यावर्षीच्या विजयात खेळाडूंनी केलेली कामगिरी, व्यवस्थापनाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास याबरोबर ‘श्रेयस अय्यरच्या’ कप्तान पदालासुद्धा तेवढेच ‘श्रेय’ जाते. ज्या ठिकाणी रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी की जे IPL च्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेत, तसेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा संघ सुद्धा जिथे समाविष्ट आहे. अशा ठिकाणी आपला एक वेगळा ठसा उमटवू पाहणाऱ्या या नवख्या कर्णधाराचे कौतुक करावे तितके कमीच आहे आणि कदाचित यामुळे ‘आपल्याला यावर्षी IPL मध्ये एक नवीन विजेता मिळू शकेल का?’ असा प्रश्न आम्हां क्रिकेट रसिकांना नक्कीच पडलेला आहे!
महत्वाच्या बातम्या :-
- #TRPSCAM : ‘आघाडी सरकारच्या अपयशावरून अन्यत्र लक्ष वळविण्यासाठी वाहिन्यांवर कारवाई’
- मराठा आरक्षण : राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज : भाजप
- किस्से राजकारणातले : उच्चस्तरीय चर्चा करण्यासाठी ‘गोदरेज कपाटावर’ फोन ठेवणारा मराठी खासदार
- MPSC परीक्षा पुढे ढकलणं म्हणजे सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण – पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

