मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी भाजपने दि. २६ जून रोजी केलेल्या चक्का जाम आंदोलनात महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला होता. ‘माझ्या हाती सूत्रं दिल्यास ४ महिन्यांत ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण मिळवून देईन आणि आरक्षण न मिळाल्यास राजकारणातून संन्यास घेईन,’ अशी गर्जना देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
फडणवीसांच्या या वक्तव्यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत टीकास्त्र सोडलं होतं. ‘देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असंच वक्तव्य केलं होतं. ते मला चांगलं आठवत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता.
संजय राऊत यांच्या टीकेचा आता भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘संजय राऊत खातो शिवसेनेचं आणि जागतो पवारांना. संजय राऊत सारख्या भाटाची धनगर समाजाला गरज नाहीये. जे आदिवासींना ते धनगरांना, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या काळात १ हजार कोटींचं पॅकेज दिलं होतं. मात्र संजय राऊतांच्या मालकाने त्यातील १ रुपयाही खर्च केला नाही. याबद्दल त्यांनी बोलावं.’ असं आव्हान पडळकरांनी दिलं आहे.
पडळकरांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत विखारी टीका केल्यामुळे शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच जातीपातीवर मतं मागितली नाहीत. कधी जातीचं राजकारण केलं नाही. मोठ्या माणसांची नावं घेतली की आपलं नाव मोठं होतं असं पडळकरांना वाटतं. गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत आणि अशी बांडगुळं वाढत आहेत,’ अशी बोचरी टीका मनिषा कायंदे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेतून केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेसचे नेते म्हणजे अज्ञानाचा महामेरू’; भाजप नेत्याची खोचक टीका
- ‘राज्य सरकार निवडणूक आयोगाला मनुष्यबळ देणार नाही, काय करायचं ते करा’
- शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी घेतली मुख्य सचिव कुंटे यांची भेट
- मेनका गांधींबद्दल भाजप नेत्याचे आक्षेपार्ह ट्वीट, वाद निर्माण होण्याची शक्यता
- ‘ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेले पण मी केंद्रात प्रयत्न करणार’- आठवले


