Share

महाराष्ट्रात गाढवांचे बुद्धिबळ सुरू असून गाढविणी सौंदर्य स्पर्धेत उतरल्या आहेत

Published On: 

🕒 1 min read

महागाई विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरल्यावर अनेकांचा जळफळाट होत असून एवढा जळफळाटकरून घ्याल तर तुमचीच राख होईल तसेच आमदारांची फोडाफोडी हेच ज्यांचे एकमेव धोरण आहे अशा लोकांकडून महागाई कमी करण्याची अपेक्षा करणे म्हणजे गाढविणीस विश्वसुंदरीचा किताब मिळण्यासारखे आहे, म्हणत आज सामनातून थेट भाजपवर खरमरीत टीका करण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेकडून राज्यभरात महागाई विरोधात मोठ आंदोलन करण्यात आल होत. मात्र, या आंदोलनात दिल्या गेलेल्या घोषणांमुळे भाजप नेत्यांचा तीळ पापड झाला. सेनेला प्रत्युतर म्हणून शिवसनेनेचे खासदार मोदी लाटेवर निवडून आल्याच सांगत भाजप नेत्यांनी टीका केली होती. आता सामनातून करण्यात आलेल्या टीकेमुळे भाजप-सेनेतील वाद आणखीन वाढणार असल्याच दिसत आहे.

नेमक काय लिहिलय सामानाच्या संपादकीयमध्ये

सत्ता म्हणजे गुलामीच्या बेड्या नव्हेत असे मानणाऱ्यांपैकी आम्ही एक आहोत. त्यामुळेच न पटणाऱ्या अनेक गोष्टीं विरोधात परखडपणे बोलण्याचे स्वातंत्र्य आम्ही कायम राखले आहे. शिवसेनेने महागाईविरोधात जोरदार आंदोलन केले व त्याचा भडका शनिवारी मुंबईत उडाला, पण सत्ताधारी पक्षाच्या पिंपळावरील मुंज्यांना मुडद्यांच्या टाळूवरील लोणीही खायचे असल्याने त्यांनी महागाईविरोधी आंदोलनावर घाणेरड्या शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. महागाईच्या विरोधात शिवसेनेच्या झेंड्याखाली ठिकठिकाणी हजारो लोक रस्त्यावर उतरले व सरकारच्या नावाने त्यांनी शिमगा केला. ही पोटदुखी आम्ही समजू शकतो, पण ‘महागाई’विरोधात आवाज उठवणे हा राज्यद्रोही, नालायक प्रकार असल्याची उलटी बोंब मारणे म्हणजे जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखेच आहे. महाराष्ट्रात अशी सुरेमारी झाली असून जनता रक्तबंबाळ होऊन पडली आहे. सामान्य माणसांच्या जीवन-मरणाचा हा प्रश्न आहे व महागाई हा प्रश्नच नसून राजकीय बोंब आहे असे सांगणारे भंपक आहेत. भाजपच्या एका शहाण्याने सांगितले की, शिवसेना आता खाल्ल्या ताटात घाण करीत आहे. घाणीत लोळणाऱया डुकरांना कायम घाणच दिसते व घाणच त्यांचे सर्वस्व असते. काही मंडळींचा जन्म हा घाणीतच झाल्याने त्यांच्या मेंदूत व डोळय़ांत घाणच घाण आहे.

अमेरिकेत वादळ आल्यामुळे हिंदुस्थानात पेट्रोल व डिझेलचे भाव वाढल्याचे तर्क केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडले. अमेरिकेतील वादळाने युरोप व खुद्द अमेरिकेत भाववाढ झाली नाही. मग फक्त हिंदुस्थानातच का व्हावी? मोदींचे राज आल्यापासून विकास दर घसरला आहे, उद्योगधंदा घटला आहे, रोजगार कमी झाला आहे आणि महागाईचा पारा भडकला आहे. अमेरिकेतील वादळामुळे हे सर्व झाले असेल तर दिल्लीचे सरकार त्या वादळात वाहून का गेले नाही? असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण होऊ शकतो. महाराष्ट्रात व देशात स्वयंपाकाचा गॅस का महागला, भाज्या व कडधान्ये का महागली याचे उत्तर मिळायला हवे. बुलेट ट्रेनचे रूळ टाकल्याने त्यावरून महागाई एक्प्रेस घसरेल व घराघरातून सोन्याचा धूर निघेल अशी फेकाफेक आता राज्यकर्त्यांनी करू नये. लाटणे मोर्चा काढून सरकारला सळो की पळो करणाऱया मृणाल गोरे आज असत्या तर त्यांनी त्याच लाटण्याने सरकारला बेदम चोप दिला असता, पण शिवसेनेच्या रणरागिणीही काही कमी नाहीत. फक्त व्यक्तिपूजेने व सरकारचा उदोउदो करणाऱया फौजांच्या आक्रमक प्रचाराने जनतेच्या जीवन-मरणाचे प्रश्न सुटणार नाहीत. जनतेच्या आंदोलनाचा जोर आणि जोम असा काही विलक्षण आहे की, त्यामुळे निद्रिस्त मने जागी व्हावीत व जागी असलेली पेटून उठून कृतिशील बनावीत. महाराष्ट्रात सर्वच महाग झाले आहे. घरापासून शिक्षणापर्यंत, कोथिंबिरीच्या जुडीपासून साखरेपर्यंत. मग स्वस्त काय झाले? तर सरकारी पक्ष व त्यांच्या एजंटांकडून शिवसेनेस रोज मिळणारे शिव्याशाप व लाखोल्या. आम्ही

जनतेसाठी भाजप मंडळींच्या शिव्याखात आहोत व तेच आमचे टॉनिक आहे. हे टॉनिक ज्यास सदैव मिळते ते राजकीय पक्ष व संघटना किमान ५०० वर्षे जगतात, पण सध्या ‘बाळसे’ नावाची सूज धरलेल्या पक्षांना इतके आयुष्य कधी लाभणार आहे काय? मोदी लाटेवर शिवसेनेचे खासदार-आमदार निवडून आले अशी थाप मारणाऱ्यांनी तुमचे ओंडके २५-३० वर्षे शिवसेनेच्या लाटेमुळेच तरले हे विसरू नये. प्रश्न इतकाच आहे की, मोदी लाटेचा इतकाच महिमा असेल तर या लाटेने गरीबांचे प्रश्न का सुटत नाहीत व रोज लोकांना बनवाबनवीच्या टोप्या का घालाव्या लागत आहेत? अमेरिकेतील वादळाने पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले असे तुमचेच मंत्री सांगतात. मग मोदी लाटेच्या नामाने महागाई का कमी होत नाही? सरकारी खुर्च्यांची ‘दोन फुल्यां’ची मस्ती कोणी शिवसेनेस दाखवू नये. तुमच्या बारशाचे पेढे खाणाऱ्यांपैकी शिवसेना आहे व पेढेवाल्यांचे पैसेही आम्हीच दिले आहेत. महागाईविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली याचा इतका जळफळाट करून घ्याल तर त्या जळाजळीत तुमचीच राख होईल. त्यापेक्षा महागाई कमी करा. अर्थात आमदारांची फोडाफोडी हेच ज्यांचे एकमेव धोरण आहे अशा लोकांकडून महागाई कमी करण्याची अपेक्षा करणे म्हणजे गाढविणीस विश्वसुंदरीचा किताब मिळण्यासारखे आहे. महाराष्ट्रात गाढवांचे बुद्धिबळ सुरू आहे व गाढविणी सौंदर्य स्पर्धेत उतरल्या आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!