🕒 1 min read
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचं निधन झालं. कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके हे 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पुत्र भगीरथ, तीन विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे.
भारत भालके यांना कोविड-19 झाला होता. त्यातून ते बरेही झाले होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे दाखल करण्यात आलं होतं. मात्र न्युमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती ढासळत गेली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (27 नोव्हेंबर) हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली होती. रात्री साडे बारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं.
पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावातील शेतात आमदार भारत भालके यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. पुण्याहून सकाळी सात वाजता पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावाकडे पुण्याहून निघेल. सकाळी अकरापर्यंत गावी पोहोचेल. यानंतर चार वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव घरासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवला जाईल. दुपारी चार वाजता याच ठिकाणी त्यांच्या शेतात भालके यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
दरम्यान, राज्यातील अनेक नेत्यांनी ट्वीट करत त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तर ‘पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.
पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार श्री. भारत भालके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/ifO4z8cRCl
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 28, 2020
भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांना या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले आहे.
भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. 2009 साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भारत भालके हे जायंट किलर ठरले होते. 2019 साली माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता.
महत्वाच्या बातम्या
- ईडीचा धडाका सुरूच : विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांची १० तास चौकशी
- आता तरी सत्तेचा अहंकार सोडा आणि धमक्या देणे बंद करा – चंद्रकांत पाटील
- ‘रुक! अभी तय नहीं हुआ हैं…, किसके घर जाना हैं’, ईडी कारवाईवर राऊतांचा भाजप सरकारला टोला
- ‘मनोरंजन क्षेत्राबाबतचे धोरण आणि मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा’
- ‘ईडीची कारवाई ही ऑपरेशन कमळची सुरुवात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

