मुंबई : शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र कृषी आयोग स्थापन करावा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. सरकारं बदलली तरी, प्रशासकीय यंत्रणा तीच असल्यामुळे, अंमलबजावणीतले कच्चे दुवे कायम राहतात, असे कच्चे दुवे दुरुस्त करण्याचा अधिकार या कृषी आयोगाला असावा, ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पीक विमा दाव्यांची देयकं अदा न केल्याच्या निषेधार्थ येत्या बुधवारी, मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलावर निषेध मोर्चा काढणार असल्याचं, ठाकरे यांनी सांगितलं. त्यानंतरही विमा कंपन्या पीक विम्याच्या दाव्यांचा निपटारा करणार नसेल, तर शिवसेना आपल्या भाषेत त्यांना समज देईल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. सरकारच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी बँकांनी प्रसिद्ध करावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.


