मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी एक पत्र लिहिलं. या पत्रातून त्यांनी राज्यातील मंदिरं पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. अतिशय खरमरीत लिहिलेल्या या पत्रात त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्त्वाचा मुद्दाही अधोरेखित केला.
याशिवाय, ज्या धर्मनिरपेक्ष या शब्दाचा द्वेष तुम्ही करत होतात तिच भूमिका आता घेतली का, असा प्रश्न राज्यपालांनी पत्रातून उपस्थित केला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व सावधगिरी बाळगत मंदिरं पुन्हा उघडण्यास परवानगी देण्यात यावी याची विचारणा त्यांनी या पत्रातून केली. बार, रेस्तराँ आणि समुद्रकिनारे खुले होतात. पण, दुसरीकडे देव- देवतांना मात्र लॉकडाऊनमध्ये राहावं लागत आहे, असा उपरोधिक टोला राज्यपालांनी लगावला.
राज्यपालांच्या पत्राला हिंदुत्वाला मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही, असं सडेतोड उत्तर मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलं आहे.‘मी अचानक धर्मनिरपेक्ष झालो का? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळं उघडणं म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणं म्हणजे धर्मनिरपेक्ष असं आपलं म्हणणं आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा धर्मनिरपेक्ष आहे तो आपल्याला मान्य नाही का?,’ असा सवाल मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना विचारला आहे.
याच मुद्यावरून भाजपा नेते आ. आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी! असं शेलार यांनी महाविकासआघाडी सरकार निशाणा साधला आहे. जे कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेमध्ये ‘शेजारी-शेजारी’ बसलेत. यानीच अयोध्येत रामाच्या मंदिराचे भूमीपुजन ई पद्धतीने करा, असे अनाहूत सल्ले दिले होते. ‘भारत तेरे तुकडे हो हजार’ म्हणाऱ्यांचे मुंबईत स्वागत केले.त्यांच्या कार्यक्रमाला हे चालले होते. एवढेच नाहीतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची संगत ज्यांनी केली. याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना मुंबईचे पालकमंत्री ज्यांनी केले.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांच्या बचावासाठी उतरले असून राज्यपालांना त्यांनीही प्रत्युत्तर दिले. राज्यपाल हे घटनात्मक पद असून, घटनेनुसार राज्य चालतंय का नाही, हे पाहणं त्यांचं काम आहे. ज्यांनी देशात हिंदुत्वाचा वणवा पेटवला, त्या शिवसेनाप्रमुखांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे, आम्हाला हिंदुत्वाचे धडे घेण्याची गरज नाही, आमचा आत्मा आणि मन हिंदुत्वाचं आहे. आजच, पतंप्रधानांनी स्पष्टपणे सांगितलंय की, महाराष्ट्राला अद्यापही कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे, जनतेची काळजी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तमपणे आपली जबाबदारी सांभाळत आहेत. त्याबद्दल राज्यपालांनी त्यांचं कौतुक करायला हवं, असा सल्लाच संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारींना दिलाय.
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेल्या सडेतोड उत्तराने भाजपनेते राज्यपालांच्या बचावासाठी सरसावले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी खूप मोठी तडजोड केली. अशातच कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने उद्धव ठाकरे यांना सध्या प्रत्येक गोष्टीचा राग येत आहे. त्यामुळेच राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना त्यांचा तोल गेला. मला मुख्यमंत्र्यांविषयी सहानुभूती आहे. मात्र, राज्यपालांसारख्या वयस्कर व्यक्तीशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अहंकारी भाषेचा वापर करणे, कितपत योग्य आहे, असा सवाल किरीट सोमय्या यांनी TV9 मराठीशी बोलताना उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या-
- ‘काँग्रेसची मंडळी केवळ राजकारणासाठी नव्या कृषी कायद्यांना विरोध करत आहेत’
- मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे आंदोलन, प्रविण दरेकर-प्रसाद लाड पोलिसांच्या ताब्यात
- धक्कादायक! राज्यात तब्बल साडे 12 लाख सदोष RTPCR किट्स वितरित,टोपेंची कबुली
- ‘ऊर्जामंत्र्यांनी इतर राज्यात लक्ष देण्याऐवजी आपल्या खात्याच्या कारभारावर लक्ष देणे गरजेचे’
- महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत आघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही; पाटील यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

