टीम महाराष्ट्र देशा- बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्षांची गेले दोन दिवस तारांबळ सुरु होती. त्याला काही प्रमाणात यश आल्यानं काही ठिकाणी बंडखोरांनी काल माघार घेतली. पण तरीही बहुतांश मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती होणार आहेत.
पुण्यातल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच नाराजी आणि बंडखोरीचा सामना करावे लागलेले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात ,निवडणूक अर्ज दाखल करणारे परशुराम सेवा संघाचे उमेदवार सत्यजीत देशपांडे यांनी अखेर माघार घेतली आहे. ब्राह्मण महासंघानंही पाटील यांना पाठिंबा जाहीर करुन मयुरेश अरगडे यांचा अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता पाटील यांचा थेट सामना मनसेचे किशोर शिंदे यांच्याशी होणार आहे.
दरम्यान, कसबा मतदारसंघातून मात्र शिवसेनेचे बंडखोर विशाल धनवडे यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांच्यापुढे इतर उमेदवारांबरोबरच धनावडे यांचंही आव्हान आहे.रत्नागिरी जिल्ह्यातल्या भाजपच्या सर्व पाचही बंडखोरांनी माघार घेतली आहे; त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांचा जीव भांड्यात पडला आहे.
पालघरमध्ये शिवसेनेचे नाराज आमदार अमित घोडा यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.कोल्हापूर जिल्ह्यातही काँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप महायुतीमध्ये बंडखोरांचं आव्हान कायम आहे. परभणी जिल्ह्यात चारही मतदार संघात बंडखोरी झाली असून, स्थानिक नेत्यांसह वरिष्ठ नेत्यांनाही बंडखोरी रोखण्यात अपयश आले.
सिंधुदुर्गमध्ये मात्र तीनही मतदार संघात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना बघायला मिळणार आहे. कणकवलीत भाजपचे नितेश राणे विरुद्ध सेनेचे सतीश सावंत; कुडाळ मध्ये शिवसेनेचे वैभव नाईक विरुद्ध स्वाभिमानचे रणजित देसाई, तर सावंतवाडीत दीपक केसरकर विरुद्ध भाजप बंडखोर राजन तेली अशी लढत होणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भाजपच्या नाराज उमेदवारांनी बंडाचा झेंडा कायम ठेवल्यान , पाचही मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात नवापूर मधील राष्ट्रवादीचे बंडखोर शरद गावित आणि अक्कलकुव्यातुन भाजपाचे बंडखोर नागेश पाडवी यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी आणि वसमत विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दहा अपक्ष उमेदवारांनी तर हिंगोलीमध्ये दोघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.लातूरच्या औसा मतदारसंघामध्ये भाजपचे बंडखोर बजरंग जाधव आणि अहमदपूरमध्ये भाजपाचेच दिलीपराव देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे.
दरम्यान,राज्यातल्या लढतींच चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता सर्वच पक्ष आजचा दसऱ्याचा मुहूर्त साधून प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहेत. आजचा दसऱ्याचा मुहूर्त साधून सर्वच राजकीय पक्ष राज्यात निवडणूक प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांच लक्ष लागल आहे. काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून सुरूवात करणार आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

