टीम महाराष्ट्र देशा : राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राज्यातील भाजप विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ताधारी भाजपला धूळ चारण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दादर येथील कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीवेळी स्वाभिमानी पक्षाचे नेते रविकांत तुपकर देखील उपस्थित होते.
जवळपास एक तासांहून अधिक वेळ या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. भाजपाला हरविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मनसे-स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीसोबत राहणार की राज्यात नवीन समीकरण तयार होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान स्वभिमानीने विधानसभेची तयारी सुरु केली आहे. ‘विधानसभेची निवडणूक महाआघाडीतून लढवायची की स्वबळावर, याचा निर्णय ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल. मात्र, ४९ जागांवर निवडणूक लढविणार आहे,’’ अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुण्यात केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

