मुंबई : कोरोना व्हायसरचा राज्यात झपाट्याने प्रसार होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केलेल्या उपाययोजनांचं, कामाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. यावेळी राज ठाकरेंनी सरकारी कर्मचारी, डॉक्टर, पोलीस, केंद्र आणि राज्य सरकारचं अभिनंदनही केलं. सरकारला उपाययोजना करायला थोडा उशीर झाला आहे, मात्र सरकारनं योग्य पावलं उचलल्याचं राज ठाकरे म्हटलं आहे.
राज म्हणाले, “यासंदर्भात काल माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय. करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे. पण आता पुढे जाऊन देशांतर्गत विमान वाहतूकही थांबवायला हवी, अशी सूचना आपण मुख्यमंत्र्यांना केली. ज्यांनी आजवर डॉक्टरांवर हात उचलले आहेत. त्यांना आता त्यांचं महत्व कळतं असेल. त्या सर्वांना जाणीव झाली असेल की आपण काय चूक केली आहे.”
राज्यात 144 कलम लागू केल्यानंतर याचं अनेक ठिकाणी उल्लंघन होत आहे. तसंच करोनाग्रस्त रुग्णांच्या वाढते संख्येमुळेही आता सरकार आणि प्रशासनासमोर आव्हान उभं राहिलं आहे.दरम्यान, मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांच्या उपस्थितीत सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांसोबत व्हिडीयो काँनफरसिंगद्वारे बैठक झाली.
कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आज सरकार कडून दिले जाण्याची शक्यता आहे. तसंच करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणखी काय उपाय योजना जाहीर केले जातात का, हे आता पहावं लागणार आहे.


