पुणे – ठाकरे सरकारनं महानगरपालिकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असेल. गेल्या काही काळापासून वॉर्ड तसच प्रभाग पद्धतीवर मोठं राजकारण सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
स्थानिक नेत्यांच्या मते, एक सदस्यीय वॉर्डरचना चांगली होती. बहुसदस्यीय रचना झाल्यावर आधीच्या दुसऱ्या वॉर्डात कसे मतदान होते, यावरही लक्ष द्यावे लागेल. तसेच आपल्यासोबतचे उमेदवार कसे असतील, यावरही बरेच काही अवलंबून आहे. अनेक नगरसेवक खूप मेहनत घेऊन आपापल्या वॉर्डासाठी कार्य करत असतात. मात्र प्रभाग रचना विस्तारल्याचा फटका अशा कार्यकर्त्यांना बसेल असं सांगितले जात आहे.
दरम्यान, या निर्णयावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शहराचे वाढते भौगोलिक क्षेत्र पहाता बहुसदस्यीय पद्धतीची आवश्यकता होती. महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. यापूर्वी तीन नगरसेवकांचा प्रभाग असताना राष्ट्रवादीला यश मिळाले होते. आताही पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देतील. भाजप विरोधातील रोष आगामी निवडणुकीत पुढे येईल.
दुसऱ्या बाजूला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडीने प्रथमपासून त्यांच्या सोईने प्रभागरचना जाहीर करण्यास सुरुवात केली. प्रथम एक, नंतर दोन सदस्यीय प्रभागाचा आग्रह धरण्यात आला. नव्याने तीन सदस्यांचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रभाग कसाही असला तरी पाच वर्षांत भाजपने केलेल्या कामांवर विश्वास ठेवून पुणेकर आगामी निवडणुकीतही भाजपला स्पष्ट बहुमत देतील. या प्रभाग रचनेचा आमच्यावर काहीही फरक पडणार नसून पुणेकरांना आमच्या कामावर विश्वास असल्याचे मत मोहोळ यांनी व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा राजकीय लाभ कोणाला होणार ?
- ‘पुणे महापालिकेत प्रभाग कितीचा आणि कसाही झाला तरी पुणेकरांचा कौल भाजपच्याच बाजूने राहणार’
- शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आलेले अश्रू केंद्र सरकार पुसणार आहे का? आ. धीरज देशमुखांचा सवाल
- ठरलं ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठे बहुसदस्यीय तर कुठे एक सदस्यीय
- ‘नव्या प्रभाग रचनेचा आमच्यावर काहीही फरक पडणार नसून पुणेकरांना आमच्या कामावर विश्वास आहे’


