मुंबई : राजस्थानातील आमदारांना विकत घेऊन काँग्रेस सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी रूपये जमवले आहेत. असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, केंद्रातील भाजपचे सरकार सत्ता पैसा आणि इन्कम टॅक्स यांचा वापर करून विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते यासाठी वापरले जात आहेत. कर्नाटकातील काँग्रेस जेडीएसचे सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा वापर केला गेला आहे.
सावंत म्हणाले की, कर्नाटकच्या आमदारांना भाजप सरकारच्या काळात मुंबईच्या हॉटेलात पोलिस बंदोबस्तात डांबून ठेवले होते. महाराष्ट्रातील भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्याच्या घरी यासंदर्भातल्या बैठका होत होत्या, हे राज्यातील जनतेने पाहिले आहे. आताही महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी रूपये जमा करून राजस्थान सरकार पाडण्यासाठी पाठविले आहेत अशी खात्रीशीर माहिती आपल्याला मिळाली असून आपण यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे.
महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेसला कोणी विचारात तरी घेत का, भाजपचा कांग्रेसवर पलटवार
यावर आता भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सचिन सावंत यांना प्रत्युत्तर दिल आहे. या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेत सचिन सावंत यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. सावंत यांचा आरोप अत्यंत बिनबुडाचा आणि तथ्यहीन आरोप आहे. असा आरोप करणाऱ्यांना सांगणं आहे की, आमदार हे लोकप्रतिनिधी असतात. तुमच्या पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेला आमदार हा विकला जातो, तुमच्यासाठी तो विकाऊ वस्तू असल्याची टीका दरेकर यांनी काँग्रेसवर केली. तसेच काँग्रेसच्या नेत्यांची अलीकडच्या काळात जी वक्तव्ये होत आहेत ती कोरोनामध्ये महाराष्ट्र सरकार तथा महाविकासआघाडी सरकारला आलेले अपयशापासून लक्ष विचलित करण्यासाठी आहेत. कधी भाजप सरकार पाडतंय, कधी राजस्थानला मदत करतोय अशा प्रकारची निराधार वक्तव्य करण्याची स्पर्धा काँग्रेसमध्ये लागल्याचे शंका येत असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले.
बिनबुडाचे आरोप करुन सचिन सावंत आपल्या वरिष्ठांना खुश करु शकतात, राजकीय स्पर्धेत काही मिळवण्यासाठी त्यांना या सगळ्याचा उपयोग होईल. तसेच विधान परिषदेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सचिन सावंत अशाप्रकारची वक्तव्ये करत असतील. परंतु, अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे जनतेमध्ये आपली प्रतिमा ही बिनबुडाचे आरोप करणारा प्रवक्ता अशी होईल याचे भान असावे. म्हणूनच सावंत यांच्यासारख्या होतकरु नेत्याने बोलताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असा सल्लाही दरेकर यांनी दिला.
एसटी महामंडळाची 2019 ची सरळसेवा स्थगित, अनेकांवर कोसळणार बेरोजगारीची कुऱ्हाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

