मुंबई : यंदा संपूर्ण देश कोरोनाच्या संकटातून जात आहे. अशातच राज्यात परतीचा पाऊस, कीड, अतिवृष्टी, आदी संकटांची भर पडत आहे. तर, मुंबईच्या चिंतेत अजून एक भर पडली असून अवघी मुंबई वीजसंकटात सापडली आहे. मुंबईसह उपनगरामध्ये आज सकाळी अचानक वीज पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे लोकल सेवाही ठप्प झाली आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते जवळपास सर्वच क्षेत्रांना याचा मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशीदेखील त्यांनी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी यासंदर्भात बोलताना मुंबईत खंडीत झालेल्या वीजपुरवठ्यासंदर्भात बोलताना माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘मुंबईत 2000 मेगावॅटच्या वर वीजपुरवठा खंडीत होणं हे दुर्भाग्यपूर्ण असून महाराष्ट्राची बदनामी करणारं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,गेल्या तीन दिवसांपासून कळवा ते तळेगाव वीजवाहिनी ब्रेकडाऊनमध्ये असून दुरूस्त केलेली नाही. मुंबईला वीजपुरवठा करण्याकरता कळव्याला फिडिंग करावं लागतं. त्यानंतर कळवा ते पडघा ही विद्युत वाहिनी सात वाजता ब्रेकडाऊनमध्ये गेली. आपल्या महाराष्ट्रातील ट्रान्समिशन आणि इतर विद्युत उपकरणं आधुनिक आहेत. त्यामुळे कुठेतरी दुर्लक्ष झालं, विद्युत वाहिनी लगेच दुरुस्त केली गेली नाही. तसेच अधिकाऱ्यांनीही हलगर्जीपणा केला. कारण पहिली विद्युत वाहिनी जेव्हा ब्रेकडाऊन झाली त्यावेळी ते 15 मिनिटांत दुरूस्त करणं गरजेचं होतं. आपल्याकडे आधुनिक उपकरणं असतानाही ते केलं गेलं नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.’
महत्वाच्या बातम्या-
- मुंबई बत्ती गुल झाल्याने सर्वसामन्यांचे हाल; मुख्यमंत्र्यांनी दिले तातडीने चौकशीचे आदेश
- अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी गुणांची अट शिथिल
- कॉंग्रेसला तगडा झटका : कॉंग्रेसची साथ सोडत अभिनेत्री खुशबू सुंदर यांचा भाजपमध्ये प्रवेश
- देशात 60 लाख कोविड रुग्ण झाले बरे; अर्ध्याहून अधिक रुग्ण ‘या’ पाच राज्यातले
- कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत सातत्याने घसरण सुरूच; बरे होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ


