टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या खातेवाटपानंतर शिवसेना खासदार संजय राऊतयांनी खातेवाटपानंतर महाराष्ट्राला आता शांत झोप लागेल अशी प्रतिक्रिया दिली . आघाडीचं सरकार चालवताना सगळ्या पक्षांनी तडजोड, देवाणघेवाण करायची असते, त्यामुळे खातेवाटपावरून काँग्रेस पक्ष नाराज नाही, असंही राऊतांनी सांगितलं. तसेच भाजप पराभवातून अजून सावरलेला नाही आणि त्यांना अजूनही सत्तेची स्वप्न पडत असल्याचा टोला, संजय राऊतांनी विरोधकांना यावेळी लगावला आहे.
काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीत असल्याने राज्यातील नेत्यांना तिकडे जावं लागतं. काही अपक्ष आमच्या सोबत आहेत. प्रत्येकाचे हट्ट, आवडी-निवडी, मागण्या पुरवाव्या लागतात. यासगळ्या कारणांमुळे मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर होण्यास उशीर झाला. सगळी खाती राज्याच्या आणि नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. जागांच्या तुलनेत काँग्रेसला सत्तावाटपात महत्वाचा वाटा मिळाला आहे आणि कुणावरही अन्याय झालेला नाही.
महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करण्यात शरद पवारांचं योगदान मोठं आहे. त्यामुळे त्यांचा पक्षाने महत्त्वाची खाती घेतली असतील तर त्यात काही गैर असे नाही, असंही संजय राऊतांनी म्हटलं.
खातेवाटपानंतर आता महाराष्ट्राला शांत झोप लागेल. ज्यांना मंत्री व्हायचं होतं, त्यांना पण शांत झोप लागेल. मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालं असून आता सर्व मंत्र्यांनी आता कामाला लागलं पाहिजे, असंही राऊतांनी म्हटलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

