टीम महाराष्ट्र देशा : भाजप सरकारला मिळालेल्या पाच वर्षांच्या कालावधीत अनेक कामे मार्गी लागली आहेत. परंतु राज्यातील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी कमी पडला. पुढील पाच वर्षांचा कालावधीही भाजप सरकारला मिळाल्यास सर्व कामे करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात दिली.
यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करताना यापुढेही पंढरपुरात येण्याची संधी मिळावी, असे सांगत विठ्ठलाला काय साकडे घातले याचे संकेत दिले आहेत.
मात्र दुसरीकडे राज्याचा पुढचा मुख्यमंत्री आमचा असेल. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच ही गोष्ट स्पष्ट केली आहे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी पंढरपुरात व्यक्त केले.
मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव शिवसेनेकडून पुढे केले जात आहे. यावर गोऱ्हे म्हणाल्या, आदित्य ठाकरेंवर कोणती जबाबदारी सोपवायची ते उद्धव ठाकरेच ठरवतील. ते विधिमंडळात आले तर त्यांचे स्वागतच करता येईल.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस काय ते मिळवून ठरवतील. पुढच्या एकादशीला युतीचा मुख्यमंत्रीच महापूजेला येईल. विधानसभा निवडणुकीत कोणाच्या किती जागा निवडून येतील, हे विठ्ठल-रुक्मिणीलाच माहीत, असेही त्या म्हणाल्या.


