टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील सत्तानाट्यात आता नाराजीचा नवा अंक पाहायला मिळत आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खातेवाटपाचे घोडे अखेर गंगेत नाहले पण याला तिन्हीही पक्षातील नाराजीची किनार आहे. अब्दुल सत्तार, भास्कर जाधव, पी.एन. पाटील, संग्राम थोपटे अशी नाराजांची यादी भली मोठी आहे. यात आता माजी विरोधीपक्ष नेते कॉंग्रेसचे बडे नेते कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांची भर पडली आहे.
राज्यातील कॅबिनेट मंत्री, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार प्रचंड नाराज आहेत. खातेवाटपानंतर ते प्रतिक्रिया देण्यासही ते तयार नाहीत. ‘आपणास कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. जे लिहायचे ते लिहा,’ अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यात सत्ताबदल होण्यापूर्वी काही महिने विधानसभेत विरोधी पक्षनेते व सत्ताबदलानंतर पक्षाच्या कोअर कमिटीत सहभाग, यामुळे त्यांना चांगले खाते मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, त्यांना तेवढी महत्त्वाची खाते न मिळाल्याने त्यांची नाराजी त्यांच्या बोलण्यातून आता स्पष्टपणे जाणवत आहे.
वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन हे खाते देण्यात आले आहे. शनिवारी रात्री खातेवाटप झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया घेण्यास संपर्क साधला असता त्यांनी विभागातील आगामी कामाबाबत बोलण्यास अनिच्छा व्यक्त केली. सोबतच, ‘जे लिहायचे ते लिहा,’ असे म्हणत आपली नाराजी ते लपवू शकले नाहीत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
