वसमत : राज्यात ऊस गळीत हंगामाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राज्य साखर संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शुक्रवारपासून (ता.२२) पासून कारखान्याचे गळीत हंगाम सुरु होती. मात्र वर्षी केवळ ८० ते शंभर दिवसच ऊस गाळप करता येणार असल्याचे राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले.
राज्यातील ऊस गळीत हंगामाबाबत आज राजभवनात राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, कार्यकारी संचालक संजय खताळ, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, अजित देशमुख यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
याबैठकीत राज्यातील गळीत हंगाम ता. २२ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी श्री. दांडेगावकर यांनी राज्यातील साखर कारखान्यांची परिस्थिती मांडली.
कारखान्यांना केंद्र शासनाकडून येणे असलेले सुमारे तेराशे कोटी रुपये अद्यापही देण्यात आलेले नाहीत. तसेच राज्यशासनाने कारखान्यांच्या सॉफ्टलोनचे सुमारे साडेआठशे कोटींचे व्याज दिले नाही. सदर रक्कम कारखान्यांना त्वरीत दिल्यास कारखान्यांना काही प्रमाणात का होईना मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भातील निर्णय नवीन सरकारच घेईल असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी स्पष्ट केल्याचे श्री. दांडेगावकर यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

