टीम महाराष्ट्र देशा- कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या पक्षाचे खासदार छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा देऊ लागले आहेत. खासदार विजय गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे आणखी एक शिवाजी महाराज आहेत अशी स्तुतीसुमनं उधळली आहेत. या वक्तव्यावरून राष्ट्रवादीने मोदी आणि भाजपवर हल्ला चढवला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवर यासंदर्भातील पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये गोयल यांची कीव करावी तेवढी कमी आहे असं म्हटलंय. आपण काय बोलतोय याचं साधं भान सुद्धा त्यांना राहिलं नाही. ज्यांना शिवाजी महाराज आणि त्यांचा पराक्रम माहीत नाही, असे लोक नरेंद्र मोदी यांची तुलना आता थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करत आहेत. सत्तेचा उन्माद काय असतो हे भाजप खासदार विजय गोयल यांच्या वक्तव्यावरुन दिसून येतेय. छत्रपतींचा आशीर्वाद मागणे वेगळे आणि त्यांची थेट तुलना एखाद्याशी करणे वेगळे, याचे भान कोणीतरी बेताल भाजपा नेत्यांना आणून द्यायला हवे. भाजपाच्या बौद्धिक दिवाळखोरीचं हे नवं लक्षण आहे असा टोला देखील लगावला आहे.
भाजपा खासदार विजय गोयल यांनी सोमवारी कलम 370 हटवल्यानंतर सभागृहात चर्चेदरम्यान केंद्र सरकारच्या निर्णयाचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे आणखी एक शिवाजी महाराज आहेत अशा शब्दात मोदींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी वाईट शक्तींविरोधात लढाई केली होती. तसेच दहशतवाद आणि भ्रष्टाचाराविरुद्ध नरेंद्र मोदींची लढाई निरंतर आहे असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, खासदार संभाजीराजे यांनी देशाला एकत्र करणारा आजचा निर्णय छत्रपती शिवरायांना सुद्धा आवडला असणार अस म्हणत या निर्णयाला पाठींबा दिला आहे. देशाला एकत्र करणारा निर्णय छत्रपती शिवरायांना सुद्धा आवडला असणार. प्रत्येक भारतीयांचे स्वप्न आज पूर्ण झाले ! खऱ्या अर्थाने काश्मीर भारताचे अविभाज्य अंग बनले. या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार मला ही होता आलं, हे मी माझं भाग्य समजतो असं म्हटलं आहे.
बारामतीचे पाणी तोडणाऱ्या रणजितसिंहांची मोदींकडून विचारपूस
तुम्ही इतक्या उंचीवर पोहोचला की तुमचा जमिनीशी संपर्क तुटला ; मोदींचा विरोधकांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

