नागपूर : पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा फायदा होईल या हेतूने प्रभाग रचना करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेत शिवसेनेचा फायदा होईल, अशा प्रकारची प्रभाग रचना करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा कुठलाही विचार करण्यात आलेला नाही. यामुळे या प्रभाग रचनेवरून काँग्रेस नाराज असून यावर आक्षेप घेतला आहे, तसेच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
“निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिकांच्या प्रभाग रचना करण्यात येत आहेत. या प्रभाग रचनेवरून काँग्रेस नाराज आहे. ज्या पद्धतीने प्रभाग रचना होत, ती योग्य नाही. विशेष करून आमची मागणी दोन जागांच्या प्रभागांची होती. पण तिथे तीनचा प्रभाग करण्यात आला. अनेक ठिकाणी म्हणजे मुंबई आणि पुण्यात आपल्या सोयीनुसार महाविकास आघाडीतील काही पक्षांनी प्रभागांची रचना केली आहे. यामुळे याविरोधात आम्ही निश्चितपणे कोर्टात जाऊ आणि न्याय मिळवण्याची आमची भूमिका आहे”, असे नाना पटोले म्हणाले.
तसेच मुंबईतील प्रभाग रचनेवरून नाराज असलेल्या काँग्रेसने आता मुंबई महापालिकेच्या नालेसाफाईत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला देखील आहे. या प्रकरणी काँग्रेसने कोर्टात धाव घेऊन नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडली. नाना पटोले म्हणाले, “भ्रष्टाचार हा नंतर भाग आहे. पण दरवर्षी पावसामध्ये मुंबई पाण्याखाली येते. मुंबईत अनेक वर्षे काँग्रेसचा महापौर राहिलेला आहे. काँग्रेसच्या काळात कधीच मुंबई डुबली नाही. पण अलिकडच्या काळात सातत्याने मुंबई पाण्याखाली येते. यामुळे मुंबईच्या जनतेसाठी काँग्रेस कोर्टात गेली आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
