🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा– युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ हा खरं तर बिहारी आहे, पण त्यानं ते सांगू नये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्याला धमकावलं जातंय, असा आरोप बिहारचे खासदार आणि काँग्रेस नेते अखिलेशप्रसाद सिंह यांनी केलाय. पृथ्वी शॉच्या घरच्यांनाही मनसे अध्यक्षांच्या नावानं धमक्या येत आहेत. क्रिकेट संघातून बाहेर जावं लागेल, अशा या धमक्या येत आहेत, असं अखिलेशप्रसाद म्हणाले.अखिलेशप्रसाद सिंह राज्यसभेचे खासदार असून बिहार काँग्रेसच्या निवडणूक मोहिमेचे अध्यक्षही आहेत.
सध्या विंडीजविरुद्धच्या मालिकेत मुंबईकर पृथ्वी शॉ आपले नाण खणखणीत वाजवून दाखवत आहे. पृथ्वीने पहिल्या कसोटीत शतकी खेळी केल्यानंतर, दुसऱ्या सामन्यातही झुंजार अर्धशतक झळकावले. पण त्याच्या खेळीचे कौतुक करण्याऐवजी त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणावरुन राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे. पृथ्वी शॉ हा मूळचा बिहारचा असून, आपली खरी ओळख सांगू नये म्हणून त्याला मनसेकडून धमक्या मिळत असल्याचा आरोप बिहारचे काँग्रेस खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी केला आहे.
दरम्यान,मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यासर्व प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, आम्ही कशाला अशा धमक्या देऊ? उद्या कुणीही उपटसुंभ उठून आमच्या नावाने काहीही सांगेल. ज्याला धमक्या मिळाल्या असं ते म्हणतात, त्या पृथ्वी शॉचे आई- वडील किंवा तो स्वतः याबाबत काहीही बोलत नसताना या बिहारच्या खासदारांना ते कसं समजलं? या आरोपांमध्ये किती सत्य आहे, ते तुम्हीच पृथ्वी शॉच्या घरच्यांना विचारा, असंही ते म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

