मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुधीर मुनगंटीवार राज्य सरकारच्या कारभारावर हल्लाबोल करत असताना सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी त्यांना टोकण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, शेतकरी, आरक्षण, नियुक्त्या, कोरोना काळातील भ्रष्टाचार आदी मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकार बोलू शकत नाही. अधिवेशन केवळ दोन दिवसांचं करून त्यांनी लोकशाहीला कुलूप लावलंय, जनतेशी यांना काहीही घेणंदेणं नाही, अशी टीका भाजपकडून करण्यात येत आहे.
‘विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन अवघ्या दोन दिवसांचे घेत प्रश्नांपासून निव्वळ पळ काढण्याचा प्रयत्न मविआ सरकार करत आहे. मात्र शेतकरी, एमपीएससी विद्यार्थी, मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण यासह अन्य प्रश्नांवरून सरकारला आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही,’ असं भाष्य भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी केलं.
‘महाविकास आघाडी शासनाचीही दुर्दशा, शेतकऱ्यांना नाही उमेदीची आशा! पीक विमा कर्ज असो वा फसवी कर्जमाफी खरंच आता शेतकऱ्यांना या सरकारकडून कसलीही अपेक्षा उरलेली नाही. सामान्यांची मुस्कटदाबी केलीत तरी विरोधी पक्षाचा आवाज तुम्हाला बंद करता येणार नाही!,’ असा इशारा देखील लाड यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएलमध्ये दोन नवीन संघ आणण्यासाठी बीसीसीआय सज्ज ; लवकरच करणार घोषणा
- निर्मीती क्षेत्रात पदार्पन केलेल्या आलियाकडे शाहरुखने केली ‘ही’ मागणी
- ‘इम्पेरिकल डेटा केवळ राज्य सरकार गोळा करू शकते, ठराव फक्त दिशाभूल करण्यासाठी’
- श्रेय तुमचे, पण मोदींकडे चला आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, भुजबळांचे फडणवीसांना आवाहन
- ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने इम्पेरिकल डेटा देण्यासाठीचा ठराव विधानसभेत मंजूर

