मुंबई – 5 जुलै आणि 6 जुलै या दोन दिवशी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पाडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोना आणि इतर मुद्द्यांवरून अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी विरोधी पक्षाने केली होती. त्यानंतर हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. पण त्याआधी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एक आठवण करून दिली आहे.
येत्या 5 दिवसात पावसाळी अधिवेशन येऊ घातलं असताना अद्याप विधानसभा अध्यक्षपदाबाबत कोणताही निर्णय ठाकरे सरकारने घेतला नाही याची आठवण भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून करून दिली आहे. दरम्यान, यानिमित्ताने पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा चर्चेत आला आहे. खरतर मागील अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा निकालात काढता आला असता मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना या निवडणुकीसाठी फारसे उत्साही असल्याचे दिसून आले नाही. सोबतच कोरोनाच्या स्थितीमुळे बरेच आमदार गैरहजर होते आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणूक घेतली तर काही दगाफटका होऊ शकतो अशी शंका आल्यानेच ती निवणूक टळली.
अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेसाठी किमान तीन दिवस लागतात. ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरायचा असतो त्याच्या आदल्या दिवशी तशी घोषणा करावी लागते. दुसऱ्या दिवशी अर्ज भरला जातो आणि तिसऱ्या दिवशी प्रत्यक्ष निवडणूक होत असते त्यामुळे या दोन दिवसांच्या अधिवेशनात आता हे दिव्य ठाकरे सरकार कसे पार पाडणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे पत्र पाठवून एकप्रकारे राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्नच राज्यपालांनी केल्याचे दिसून येत आहे. राज्यपालांनी पत्र पाठवून जे मुद्दे उपस्थित केले आहेत ते महत्वाचे आहेतच मात्र राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्यांचा प्रश्न कधी निकाली काढणार याबाबत मात्र ते काहीही भूमिका घेताना दिसून येत नाहीत याबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.
महाविकास आघाडीतील नेते हे वारंवार याबाबतची मागणी करून देखील ते याकडे दुर्लक्ष का करत आहेत हे न उलघडणारे कोडे आहे. जी तत्परता राज्यपाल विधानसभा अध्यक्षपदाच्या बाबतीत दाखवत आहेत तशीच तत्परता १२ आमदारांच्या नियुक्त्यांच्या संदर्भात देखील दाखवावी हीच अपेक्षा महाविकास आघाडीतील नेत्यांना असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आता चित्रा वाघ यांच्या खांद्यावर चंद्रकांतदादांनी सोपवली ‘विशेष’ जबाबदारी !
- व्हीप म्हणजे काय?, तो का काढतात?; जाणून घ्या सविस्तर
- पवार-ठाकरे भेटीत नेमकी काय चर्चा झाली ?
- उद्धवजी… जबाबदारी एकमेकांवर ढकलून लसीकरण मोहीम यशस्वी होईल का ?
- समता फाऊंडेशनचे उल्लेखनीय कार्य! ३० हजार जणांचे मोफत लसीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

