मुंबई : “ज्यांनी सैन्यातील आरोग्य विभागात काम केलं आहे किंवा जे डॉक्टर्स, परिचारिका किंवा वॉर्डबॉय निवृत्त झाले आहेत त्यांनी आमच्यासाठी संपर्क साधावा आणि या युद्धात साथ द्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी राज्यातील निवृत्त आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स, परिचारिका, आणि कर्मचाऱ्यांना हे आवाहन केलं आहे.
फेसबुक लाईव्ह च्या माध्यमांतून त्यांनी आज जनतेशी संवाद साधला यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ ज्यांनी सैन्य दलातील आरोग्य विभागात काम केलं आहे. तसंच जे डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय हे निवृत्त झाले आहेत किंवा ज्यांनी याबाबत शिक्षण घेतलं आहे आणि ज्यांना काम मिळालं नाही, त्यांनी पुढे यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ज्यांना या युद्धात सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी Covidyoddha@gmail.com या ईमेल आयडीवर नाव, नंबर, संपर्काचा पत्ता यासह संपर्क साधावा, असंही ते म्हणाले.
त्याचबरोबर महाराष्ट्रात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना बाधितांवर चांगले आणि प्रभावी उपचार करता यावेत यासाठी महत्वाची घोषणा केली आहे. करोनाग्रस्तांवर उपचारांसाठी चार भागांमध्ये आरोग्य सेवेची विभागणी करण्यात आली आहे. राज्यभरात फिव्हर क्लिनिक्स सुरु केली जाणार आहेत. राज्याच्या प्रत्येक विभागात ही क्लिनिक्स सुरु केली जाणार आहेत. त्यामुळे चार प्रकारामध्ये ही फिव्हर क्लिनिक्स सुरु केली जाणार आहेत त्यामध्ये डॉक्टर्स असतील असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं
तसेच, ज्यांना सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे असतील त्यांनी खासगी दवाखान्यात न जाता क्युअर क्लिनिकमध्ये जावे. प्रत्येक विभागात ही क्लिनिक असतील. त्याची माहिती देण्यात येईल असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच ज्यांच्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे असतील त्यांच्यासाठी एक वेगळं रुग्णालय असेल. तर ज्यांना मध्यम प्रमाणात करोनाची लक्षणे असलेल्यांसाठी दुसरे हॉस्पिटल असेल आणि ज्यांच्यामध्ये करोनाची अतीतीव्र लक्षणे आहेत तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह किडनी असे अन्य आजारही आहेत, त्यांच्यासाठी तिसरं रुग्णालय असेल. हे रुग्णालय अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच कोरोना विषाणूची आता गुणाकाराला सुरवात झाली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत २१ हजार जणांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. २२०० लोकांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आलं आहे. १५ ते १७ हजार चाचण्या आत्तापर्यंत झाल्या आहेत. ज्यांची लक्षणं सौम्य आहेत असे ६१० आहे. ११० असे आहेत ज्यांना लक्षणं आहेत. त्यापैकी २२ गंभीर आहेत. मृत्यू झालेल्यांची संख्या ६४ आहे. विषाणूचा हा गुणाकाराचा काळ आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत चिंतेच वातावरण आहे मान्य आहे. मात्र मुंबईत आणि पुण्यात चाचण्या वाढवल्या असल्याचही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.


