अमरावती – अमरावती येथे रेमडेसीविरचा काळा बाजार करणाऱ्या आरोपींना अटक झाल्यानंतर त्यांची पोलीस कोठडी न मागणे आणि या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कारवाई न करणे अक्षम्य असून कठोर कारवाईची मागणी राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. रेमडेसीविर काळा बाजार प्रकरणी भाजपा नेते डॉ. सुनील देशमुख, भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, भाजपाचे शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनुक्रमे किरण पातूरकर आणि निवेदिताताई दिघडे यांनी सतत सरकारला धारेवर धरून या प्रकरणात मुळाशी जाऊन तपास करण्याची गरज व्यक्त केली होती. रेमडेसीविर घोटाळ्यात मोठे मासे अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी थातुरमातुर कारवाई केली जाते आहे का आणि अमरावतीच्या रेमडेसीविर घोटाळ्यातील खरा सचिन वाझे कोण, याचा तपास लागावा, अशी जनभावना आहे. स्थानिक भाजपा नेत्यांनी याच दिशेने आपला पाठपुरावा चालवला आहे.आता राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांनी थेट पोलीस महासंचालकांकडे मागणी केल्यानंतर या प्रकरणाचा तपास अधिक गांभीर्याने होईल, अशी अपेक्षा आहे.
सामान्य लोक मरणाच्या दारात उभे असताना एकेक रेमडेसीविर इंजेक्शन साठी तडफडत असताना प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे लोक सुटू नये, ही अमरावतीकरांची भावना पाहता यात आता देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. पोलीस महासंचालक यांना लिहिलेल्या पत्रात, अमरावती येथे नुकतेच रेमडेसिवीरच्या काळा बाजारीचे एक रॅकेट पकडण्यात आले. सहा जणांना अटक करण्यात आली. यातील ५ व्यक्ती हे शासकीय रूग्णालयांमध्ये काम करणारे आहेत, तर त्यापैकी २ तर थेट अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी अशा वरिष्ठ पदांवर काम करणारे आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य मोठे आहे. असे असताना त्यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांची साधी पोलिस कोठडी सुद्धा मागितली जाऊ नये, हे अतिशय गंभीर असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुळातच रेमडेसिवीरचा पुरवठा हा जिल्हाधिका-यांमार्फत थेट रूग्णालयांना केला जातो. त्यामुळे कुठलीही खाजगी व्यक्ती रेमडेसिवीर वितरित करू शकत नाही. असे असताना शासकीय यंत्रणेतूनच हे काळाबाजारीचे रॅकेट चालत असेल तर या प्रकरणाची अतिशय सखोल चौकशी होणे नितांत गरजेचे आहे.या संकटाच्या काळात अनेक रूग्ण औषधाविना तडफडत आहेत. अशात त्याच औषधांचा काळाबाजार घातक आहे. अमरावती जिल्ह्यातून या प्रकरणाबाबत अनेक तक्रारी मला प्राप्त होत आहेत आणि त्यातून एकूणच स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते आहे. त्यामुळे आपण याबाबत अधिक लक्ष घालून कठोरातील कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- #CycloneTauktae : सरकार कडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सगळे प्रयत्न करू : राणे
- ‘दादा! बहुजनांचे हक्क आणि अधिकार हे तुम्हाला बारामतीची जहागिर वाटतात का?’
- ‘दिलेले वचन केले पूर्ण’, ट्विंकल खन्नाने दिल्ली आणि पंजाबमध्ये पाठवले ऑक्सिजन कंसंट्रेटर
- तौक्ते चक्रीवादळाचा महावितरणला तडाखा,अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणची कसरत
- #तोक्ते चक्रीवादळाचा कोल्हापूरलाही फटका; घरांसह शाळांचे छत उडाले, लाखोंच नुकसान


