टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या सत्ता हातातून गेल्यानंतर भाजपला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. नाशिक जिल्हा परिषदेची सत्ता हातातून गेल्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा परिषदही भाजपच्या हातातून गेली असून महाविकास आघाडीला तिथे सत्ता मिळाली आहे. भाजपचे दिग्गज नेते चंद्रकांत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातोय. पश्चिम महाराष्ट्रातली ही मोठी राजकीय उलथापालथ मानली जातेय.
भाजपवर मात करत कोल्हापूर जिल्हा परिषेदेत कॉंग्रेसचे बजरंग पाटील यांची अध्यक्षपदी आणि सतीश पाटील यांची उपाध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे. बजरंग पाटील यांनी ४१ मते घेत विजय मिळवला तर त्यांच्या विरोधात असलेले अरुण पाटील यांनी २४ मतांवर समाधान मानावे लागले.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. अशातच नव्या वर्षाच्या सुरवातीला कोल्हापुरात जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड करण्यात येणार होती. त्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली होती. भाजपने स्थानिक आघाड्यांना एकत्र करत सत्ता टिकवून ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र याठिकाणीही भाजपला पराभव पत्करावा लागला. अडीच वर्षे विरोधात असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेच्या साथीने सत्ता काबीज केली.
कोल्हापूर जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही शिवसेनेला सोबत घेण्याची रणनीती आखली. त्यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांनी प्रदेश पातळीवरून प्रयत्न सुरू केले. त्यामुळे एक तारखेला आम्ही बहुमताच्या पुढे असू असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला होता. अखेर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या जोडगोळीने भाजपची सत्ता उलथवून लावली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

