पुणे: राज्यातील राजकारणात आज अनेक महिला सक्रीय होत आहेत. अनेक महिलांना राजकारणात येण्यासाठी कौटुंबिक पार्श्वभूमी असते तर काही महिला समोरील आव्हानांचा सामना करत राजकारणात येतात. असेच एक नेतृत्व सध्या राजकारणात उदयास येत आहे. आधी कुणाला परीचीत नसलेलं नाव आता महाराष्ट्रभर चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे चर्चेत आलेल्या त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी त्यांच्या नवीन ‘शिवशक्ती सेना’ पक्षाची स्थापना केली. दरम्यान करुणा मुंडे यांनी पुण्यात आज (१४ जानेवारी) पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजप नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली.
तसेच आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्तुती करणाऱ्या करुणा मुंडे यांचा सुर सध्या बदलला आहे. त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यावर टीका केली. त्यांचा एकूण बोलण्याचा सुर हा महाविकास आघाडीच्या विरोधात होता. त्यामुळे भविष्यात धनंजय मुंडेच्या अडचणीत देखील वाढ होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. कारण करुणा मुंडे आता जनाधार गोळा करत आहेत. विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता देखील त्यांनी बोलून दाखवली. याचा राजकीय फटका धनंजय मुंडेंना बसणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांची घेतली शाळा
“महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना बोलून अर्थ नाही, कारण त्या काही करू शकत नाही. नोटीस देणे, ट्विट करणे, मिडियाबाजी ही निव्वळ स्टंटबाजी आहे. पण प्रत्यक्षात कृती करणे महत्वाचे असते”, असे म्हणत करुणा मुंडे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जोरदार टोला लगावला. तसेच करुणा मुंडे यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर देखील फक्त पब्लिसिटी स्टंट करत असल्याची टीका केली आहे. “मी जेलमध्ये होती तेव्हा माझ्यासाठी कुणीही उभे राहिले नाही. एकमेव चित्रा ताई होत्या. परंतु, त्यांनीही फक्त मिडियासमोर पाठिंबा दिला. मात्र मी त्याला पब्लिसिटी स्टंट समजते. जेव्हा प्रत्यक्षात त्या मंत्र्याविरोधात कारवाई केली जाईल, त्याला मी आवाज उठवणे समजते”, असे करुणा मुंडे म्हणाल्या. करुणा मुंडे यांचे हे विधान बघता रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांना प्रतिस्पर्धी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील करुणा मुंडे यांनी टीका केली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा केला. परंतु, जेव्हा उद्धव ठाकरे संजय राठोड यांच्याविरोधात निदान एफआयआर दाखल करतील. तेव्हा मी राज्यात शक्ती कायदा आहे, असे मानेल. त्यामुळे राज्याचे प्रधान या नात्याने त्यांनी निदान संजय राठोड यांच्याविरोधात एफआयआर तरी दाखल करावा.”, असे करुणा मुंडे म्हणाल्या. कोरोनावरुन देखील त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. कामगारांचे प्रश्न दाबण्यासाठी सरकार कोरोनाचा बनाव करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनानिमित्त औरंगाबादेत शिवसंवाद मोहीमेचे आयोजन!
- या झुंडशाहीविरोधात आवाज उठवला नाही तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही-बाबासाहेब पाटील
- ‘…म्हणून माझ्या विरोधात कारवाया’; प्रताप सरनाईक यांचे वक्तव्यं
- संजय राऊतांच्या टीकेवर चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर;म्हणाले,‘माझी दृष्टी तपासायला…’
- “खासदार इम्तियाज जलील बेईमान”; संजय राऊत यांची टिका..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

