टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री विनोद तावडे यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या दुर्घटनेचाही विनोद तावडे यांनी ‘विनोद’ केला आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली.
२ जुलै, मंगळवार रात्री नऊच्या सुमारास तिवरे धरण फुटलं. यात बऱ्याच जणांचे जीव गेले. दरम्यान हे धरण खेकड्यांनी फोडले असे वक्तव्य जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केले होते. सावंत यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या ’खेकडा’ आंदोलनावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी टीका केली.
दरम्यान तावडे यांच्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युतर दिले आहे. आम्ही स्टंट करतो असे म्हणणारे विनोद तावडे स्वत:ला कोकणवासीय म्हणवून घेत आहेत. पण, त्यांनी महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या दुर्घटनेचाही ‘विनोद’ केला आहे.
एकीकडे सबंध कोकण दु:खात असताना कोकणपुत्र विनोद तावडे यांनीच आयोजित केलेल्या कार्यक्रमात या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्यानाचे उद्घाटन करतात. अन् विनोद तावडे हे आपल्यातील असंवेनशीलतेचे प्रदर्शन घडवतात. विनोद तावडे हे कोकणपुत्र असूनही कोकणातील माणसांच्या जखमांवर मीठ चोळतात त्यामुळे त्यांनी आधी कोकणवासीयांची माफी मागावी. नंतर पुढचे बोलावे, असे आव्हाड यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर विनोद तावडे यांना टीका करण्याचा नैतीक अधिकारही उरलेला नाही. विनोद तावडे हे आपण कोकणी असल्याचे सांगत आहेत. मात्र, तीन तारखेला धरण फुटलेले असताना चार तारखेला तावडे हे उद्यानाच्या उद्घाटनाचे आयोजन करतात कसे? असा सवालही आव्हाड यांनी केला. याचबरोबर आपला कोकणी माणूस तिवरे धरण फुटल्यानंतर निर्माण झालेल्या पुरामध्ये वाहून गेल्याचे साधे सोयरेसुतकही त्यांना राहिलेले नाही, असेही आव्हाड यांनी म्हंटले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

