🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- मृग व आद्रा नक्षत्र कोरडेठाक गेल्यानंतर थोडाफार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली होती. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या हुलकावणीने अनेक भागात दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. दुबार पेरणी करण्यासाठीची नेमकी तारीखही कृषी विभागाकडून कळविली जात नाही. किती दिवस दुबार पेरणी केली तर चालेल, याची शाश्वती नसल्याने अनेकांनी आपले शेत आता खरिपाऐवजी रबी हंगामासाठी तयार करून ठेवले आहे.
दरम्यान, राज्यात पाऊस लांबणीवर गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पण शेतकऱ्यांच्या बिकट स्थितीशी युती सरकारला काहीच घेणेदेणे नसून शिवसेना-भाजपा पुन्हा निवडून येण्यात मग्न असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केली. शेतकऱ्याला दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. बळीराजाला सरकारने हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत करण्याची मागणी आम्ही गत वर्षीपासून करत आहोत, तरीदेखील हे सरकार मदत जाहीर करत नाही, अशी खंत जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
तर दुसऱ्या बाजूला जुलै महिना संपत आला तरी राज्यात अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही. खरिपाच्या ५० टक्केही पेरण्या झालेल्या नाहीत. आताच दुष्काळासारखी परिस्थिती आहे, त्यामुळे सरकारने तातडीने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

