सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेससह सोलापूर जिल्ह्यातील नेतृत्वाचं मोठं नुकसान झालं आहे. कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरु झाल्यानंतर पुण्यातील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र, कुस्तीतून वर आलेला हा पट्ठ्या जीवनातील लढाईत हारला.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भालकेंच्या कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी व भालकेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंढरपूरचा दौरा केला. यावेळी ते भारत नानांच्या आठवणीत भावुक झाल्याचं दिसून आलं. ‘आमदार भालके यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे . त्यांच्या जाण्यानं मोठं नुकसान झालं आहे,’ अशी खंत पवारांनी यावेळी व्यक्त केली.
‘काही गोष्टी तुमच्या आमच्या हातात नसतात. पंढरपूरच्या विकासासाठी भारत नानांनी मोठी धडपड केली. भारत नाना जरी आज आपल्यात राहिले नाहीत तरी त्यांचे कर्तृत्व, त्यांची माणुसकीची भावना आणि विभागाच्या विकासासाठी त्यांना असलेला ध्यास याचा विसर आपल्याला कधीही पडणार नाही.’ असं ते म्हणाले.
‘संकटं येतात पण त्या संकटांना धैर्याने मात करावी लागते, संकटं आहेत, पण जीवाभावाचा आपला आधार गेला. आधार गेला त्याचा दु:ख आहे. नानांनी या क्षेत्राच्या विकासासाठी मोठी मोलाची कामगिरी केली. त्याची दखल आपण सर्वांनी घेतली आहे. त्यांच्यानंतर या विभागासाठी जर कोणी काही केलं असेल तर त्यामध्ये भारत नानांचं नाव प्रकर्शाने घेतलं जाईल.’ असे उद्गार देखील त्यांनी काढले.
महत्वाच्या बातम्या
- किरीट सोमय्यांवर अब्रुनुकसानीचा 100 कोटींचा दावा करणार – सरनाईक
- ग्रामपंचायत निवडणुका खुल्या वातावरणात पार पाडा; जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांना आदेश
- बीड जिल्ह्यातील दोनशे शाळा कात टाकणार; मराठवाड्यासाठी २०० कोटी
- तृणमूल काँग्रेसला खिंडार; दिग्गज नेते सोडू लागले ममता बॅनर्जी यांची साथ
- आरक्षण सोडत/ सरपंच व उपसरपंच यांची निवड मतदानानंतर 30 दिवसाच्या आत होणार


