मुंबई : कालपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली होती. पावसाळी अधिवेशनाचा कालचा दिवस खूप वादळी ठरला. कालच्या अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली होती.
तर, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील विरोधकांचा गोंधळ कायम होता. पावसाळी अधिवेशन हे अवघ्या दीड दिवसात गुंडाळण्यात आलं असून पुढील (हिवाळी) अधिवेशन हे नागपूर येथे ७ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. दरम्यान, अधिवेशनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन अधिवेशन काळातील मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
यावेळी अजित पवार यांनी भाजप आमदारांच्या गोंधळावर आणि निलंबनाच्या कारवाईवर देखील भाष्य केलं. विरोधी पक्षनेत्यांनी देखील काही सभासदांकडून चुकीचं वर्तन झाल्याचं कबूल केलं होतं. आम्ही नव्वदीपासून विधिमंडळाचे सभासद आहोत, मात्र असा गोंधळ आणि गैरवर्तन कधीही पाहिलं नाही. याने पवित्र सभागृह मंदिराचा अपमान झालाय, असं अजित पवार म्हणाले.
यासोबतच, ‘सभागृहात माईक ओढल्यानंतर दालनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार देखील झाला. भास्कर जाधव यांनी अत्यंत शांतपणे सभागृहातील स्थिती हाताळली. ते माझ्या सारखे आक्रमक आहेत, खासकरून शिवसैनिक असून देखील त्यांनी फिजिकल काही केलं नाही.’ अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली आणि उद्धव ठाकरे यांनी देखील स्मितहास्य केलं.
महत्वाच्या बातम्या
- ‘तालिका अध्यक्ष म्हणून सोंगाड्याला बसवले!’, नितेश राणेंची भास्कर जाधवांवर टीका
- भास्कर जाधव यांना पोलीस संरक्षण देण्यात येणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
- ‘…अन्यथा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही’; बावनकुळेंचा इशारा
- मागास प्रवर्गासंदर्भातील माहिती मिळण्यासंदर्भात विधिमंडळाची केंद्राला शिफारस
- शेतक-यांच्या हिताचे रक्षण करणारी कृषी सुधारणा विधेयके विधानसभेत सादर – बाळासाहेब थोरात


