नाशिक – नैसर्गिक आपत्तीला कुठलाही चेहरा नसतो, त्याचप्रमाणे पूरग्रस्तांना मदत करताना शासन कुठलाही भेद न करता शेतकरी, व्यापारी अन् घरकुलापासून वंचित झालेल्या आपत्तीग्रस्तांचे अहवाल २४ तासात करून त्यांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी कटीबद्ध असून कुठल्याही परिस्थितीत दोन दिवसात पूरग्रस्त भागाचे जनजीवन पूर्वपदावर आणावे तसेच एकही आपत्तीग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आज रात्री उशीरापर्यंत पूरग्रस्त भागांच्या पाहणी दरम्यान केल्या आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला व निफाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यात आली त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
गुलाबी चक्रीवादळामुळे नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला व निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी निफाड तालुक्यातील लासलगाव परिसरात व येवला शहर व परिसरात पाहणी करून झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर,महेंद्र काले, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वंसत पवार, साहेबराव मढवई, पांडुरंग राऊत, नगरसेवक प्रवीण बनकर, येवल्याचे प्रांताधिकारी सोपान कासार, निफाडच्या प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे, येवल्याचे तहसीलदार प्रमोद हिले, निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलजा कृपास्वामी, पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता उमेश पाटील, सहायक अभियंता सागर चौधरी, गटविकास अधिकारी उन्मेष देशमुख, संदीप कराड, अभियंता विजय पाटील, सुनील पैठणकर, यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नुकसानग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. शेतीचे पंचनामे तातडीने करून सोबत व्यावसायिकांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल देखील तात्काळ शासनास पाठवावा. ज्याठिकाणी घरांची पडझड त्या ठिकाणी पंचनामे करून घरकुलांचे नुकसान झालेले असेल त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे. स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात. या भागात आरोग्य विभागाने स्वच्छता व औषध फवारणी करावी. ज्या भागात पाणी आहे त्याठिकाचे पाणी पंपाद्वारे काढण्यात यावे. उद्या संध्याकाळ पर्यंत पूरग्रस्त भागाची साफसफाई करण्यात यावी, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.
दोन दिवसात रस्त्यांसह पडलेल्या घरांची दुरुस्ती करण्यात यावी
रस्त्यावर पडलेले खड्डे लवकर बुजविण्यात यावेत. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा करून तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना देताना निधीची कमतरता असल्यास त्याबाबत तातडीने प्रस्ताव पाठविण्यात यावेत. कोपरगाव मनमाड टोल रस्त्यावरील ड्रेनेज आणि रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी. ज्या ठिकाणी अतिवृष्टी मुळे बंधारे फुटले आहे त्यांचेही तातडीने प्रस्ताव सादर करून दुरुस्ती करण्यात यावी. चार ते पाच दिवसात पुन्हा पाहणी दौरा करण्यात येईल तोपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत, असेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्यात सर्वांना एकाच निकषावर एकसमान मदत करणार; कुणावरही अन्याय होणार नाही’
- महिलांवरील अत्याचाराच्या घटना ही चिंतेची बाब – निलम गोऱ्हे
- सहा महिन्यानंतर प्रत्येक सरकारी खात्यात ईलेक्ट्रिक वाहने असतील- आदित्य ठाकरे
- ओला दुष्काळ जाहीर करण्याचा विचार सुरु- विजय वडेट्टीवार
- ‘व्वा रे बिट्या… तुला कुणी सांगितलं ? महाराष्ट्रातील अर्धे मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्धे तुरुंगात जाईल म्हणून’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

