🕒 1 min read
औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी युद्धपातळीवर मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एका बाजूला कॉंग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत सुरु आहेत. मात्र वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेसच्या मनसुब्यांना अक्षरशः सुरुंग लावला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमनं वंचित बहुजन आघाडीकडे ८० जागांचा प्रस्ताव दिला असल्याचं औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. या ८० जागांवर सर्व जाती धर्मातल्या उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल, असं ते म्हणाले. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
एमआयएमसाठी कुठलाही समाजघटक अस्पृश्य नसून प्रत्येक समाजघटकाला आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात येईल. एमआयएम केवळ मुस्लिमांची पार्टी नसून सर्वच जाती-धर्माची लोक पक्षात आहेत. 2014 च्या तुलनेत पक्षाची ताकद वाढली आहे असे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काल आगामी विधानसभा निवडणुकीत, काँग्रेससोबत आघाडी होण्याची शक्यता नसल्याचा पुनरुच्चार प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसनं आमच्या पक्षावर भारतीय जनता पक्षाची ‘ब’ संघ असल्याचा आरोप केल्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नसल्याचं ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचा मुख्य लढा भाजपशी आहे, आणि काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्यानं हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. एमआयएमसोबतच ही निवडणूक लढली जाईल, असंही आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.


