लातूर : जिल्ह्याच्या लातूर, रेणापूर तालुक्यात शनिवारी, १८ एप्रिल रोजी रात्रीच्यावेळी वादळी वाऱ्यासह गारांचा अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी पिके, फळबागा तसेच भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. तांदुळवाडी येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यु झाला आहे. प्रशासनाने आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल अशी कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.
यासंदर्भातील अधिक माहिती शनिवारी रात्री रेणापूर तालुक्यातील यशवंतवाडी व या शिवारात वादळी वाऱ्यासह गारांचा जोरात पाऊस झाला, तसेच लातूर तालुक्यातील तांदुळवाडी येथे वीज पडून सूर्यकांत रावण घाडगे यांचा मृत्यु झाला आहे, या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेली गहू, ज्वारी, हरभरा या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.यासोबतच फळबागा आणि भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे.
रविवारी सकाळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी लातूर व रेणापूर तालुक्यातील नुकसानीची माहिती घेतली , प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत , अशा सूचना केल्या, पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचेकडेही त्यांनी यासंदर्भात माहिती देऊन आपदग्रस्तांना मदत करण्याची विनंती केली.
जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अपघातग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी असे निर्देश लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत. कार्यालयामार्फत निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार ,कृषी विकास अधिकारी यांच्याकडून अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यात आली आहे . लातूर तालुक्यातील तांदुळवाडी येथे वीज पडून मृत्यू पावलेले शेतकरी सूर्यकांत रावण घाडगे यांच्या कुटुंबीयांना तातडीने शासकीय मदत मिळवण्याची कारवाई करावी अशा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिले आहेत.


